वडिलांचा हात धरला, पण आईसह भावाचा मृत्यू; क्रूझ दुर्घटनेत चिमुकलीचं कुटुंब उद्ध्वस्त

जबलपूरच्या बर्गी धरणाजवळ क्रूझ जहाज उलटल्याने मोठा अपघात झाला. सोसाट्याचा वारा आणि उंच लाटा यांमुळे जहाजाचा तोल गेला. या घटनेत एका चिमुकलीचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. वडिलांचा हात धरून ठेवल्याने ती वाचली, पण आईसह भावाचा मृत्यू झाला.

वडिलांचा हात धरला, पण आईसह भावाचा मृत्यू; क्रूझ दुर्घटनेत चिमुकलीचं कुटुंब उद्ध्वस्त
bargi dam cruise accident jabalpur boat tragedy
Image Credit source: Instagram
| Updated on: May 01, 2026 | 11:00 AM

मध्य प्रदेशातील जबलपूर इथलं लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणावर गुरुवारी रात्री एका क्रूझचा भीषण अपघात झाला. पर्यटकांना घेऊन जाणारं एक क्रूझ जहाज नर्मदा नदीच्या खाडीत अचानक बुडालं. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा क्रूझ नदीच्या खोल खाडीत पोहोचलं, तेव्हा हवामान अचानक बिघडलं आणि जोरदार वारे वाहू लागले होते. उंच लाटा आणि जोरदार वाऱ्यांमुळे क्रूझचा तोल गेला आणि काही क्षणांतच ते पाण्यात बुडू लागलं. यानंतर लगेचच स्थानिक खलाशी आणि प्रशासनाने बचाव आणि मदतकार्याला सुरुवात केली. आतापर्यंत अंदाजे 15 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. तर बचाव पथकांनी कालपासून नऊ मृतदेह बाहेर काढले आहेत. काही लोक अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. पाणबुडे आणि एसडीआरएफच्या पथकांकडून सतत शोधमोहीम सुरू आहे.

चिमुकलीने धरला वडिलांचा हात..

या घटनेदरम्यान वाचवण्यात आलेल्या लोकांकडून हृदयद्रावक अनुभव समोर येत आहेत. वाचवण्यात आलेल्या एका मुलीशी पत्रकारांनी संवाद साधला. बचाव पथकाच्या व्हॅनमध्ये घाबरून बसलेली ती मुलगी थरथरत्या आवाजात म्हणाली, “क्रूझ अचानक पलटली आणि संपूर्ण जहाजात पाणी भरलं. सगळेजण सैरावैरा पळू लागले होते. त्यात मला माझे वडील कसेतरी सापडले, म्हणून मी त्यांचा हात धरला. माझी आई आणि भाऊ बेपत्ता आहेत. माझे आजोबाही सापडले, पण माझ्या आजीचं निधन झालं. तिचा मृतदेह सापडला आहे.”

मुलाला छातीशी कवटाळलेला आईचा मृतदेह

अपघाताच्या काही क्षणांपूर्वी आपल्या आई-वडिलांसोबत आणि भावासोबत खळखळून हसणाऱ्या त्या मुलीच्या डोळ्यांत आता केवळ वेदनाच शिल्लक राहिल्या आहेत. एका क्षणात तिचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आज सकाळी त्या मुलीच्या आईचा मृतदेह सापडला असून, तिने तिच्या मुलाला छातीशी कवटाळलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत ती आई मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आले.

प्राथमिक तपासात असं समोर आलं की अपघाताच्या वेळी नर्मदा नदीच्या खाडीतील हवामान अचानक बिघडलं होतं. जोरदार वारे वाहू लागल्याने उंच लाटा निर्माण झाल्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझ आधीच हेलकावे खात होतं, परंतु कर्मचाऱ्यांना त्याला तात्काळ किनाऱ्यावर आणलं नाही, ज्यामुळे हा अपघात घडला. या घटनेनंतर प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Follow Us