मोठी बातमी! भारताला संयुक्त राष्ट्र संघाचा मोठा धक्का; अमेरिका, इराण युद्धादरम्यान गंभीर आरोप, थेट इस्त्रायलसोबत…
अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे, एकीकडे या युद्धामुळे जगभरात मोठा तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्र संघाचा एक रिपोर्ट समोर आला आहे, या रिपोर्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये प्रचंड तणाव पहायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका आमने-सामने आहेत. सोमवारी अमेरिकेनं इराणचं एक जहाज ताब्यात घेतल्यानं इराण आता आणखी आक्रमक बनला आहे. दरम्यान हा युद्धविराम संपायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी पाकिस्तानमध्ये होणार होणार आहे. या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. मात्र दुसरीकडे आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाकडून भारताला मोठा धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टमध्ये भारतावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
दैनिक भास्करने दिलेल्या एका वृत्तानुसार संयुक्त राष्ट्र संघाच्या एका रिपोर्टमध्ये भारतावर आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की, भारताचे इस्त्रायलसोबत असलेले संबंध आणि युद्धाला असलेला पाठिंबा या संदर्भात भारतावर कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. ‘टॉर्चर अँण्ड जेनोसाइड’ नावाच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. हा रिपोर्ट संयुक्त राष्ट्र संघाच्या स्पेशल दूत फ्रांसेस्का अल्बनीज यांनी 23 मार्च रोजी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये सादर केला आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. भारताचे इस्त्रायलसोबत खूप जवळचे संबंध आहेत, त्यामुळे भारत आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत आपल्या जबाबदारीचं उल्लंघन करत आहे, भारताला याची जबाबदारी घ्यावी लागू शकते असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी असा देखील दावा केला आहे की, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्त्रायलचे व्याप्त प्रदेशावरील नियंत्रण बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. तसेच विविध राष्ट्रांना इस्त्रायलसोबत शस्त्रास्त्रांचा व्यापार करण्यास देखील मनाई केली आहे. इस्त्रायलसोबत शस्त्रास्त्रांचा व्यापार थांबवण्याचं आवाहन न्यायालयाकडून करण्यात आलं आहे, मात्र असं असताना देखील भारताकडून इस्त्रायलसोबत शस्त्रास्त्रांचा व्यापार सुरू आहे, हा व्यापार आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणारा ठरू शकतो, असं फ्रांसेस्का अल्बनीज यांनी म्हटलं आहे.