
Assam Assembly Election Congress: आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकामागून एक धक्के बसले आहे. एका नंतर एक अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला हात दाखवला आहे. आता या यादीत पक्षाचे लोकसभेतील खासदार प्रद्युत बोरदोलाई यांचे नाव जोडल्या गेले आहे. त्यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. बोरदोलोई नागाव या लोकसभा मतदार संघातून दोनदा काँग्रेसचे खासदार राहिले आहेत. तर यापूर्वी आसामच्या काँग्रेस सरकारमध्ये मंत्री पण होते. बोरदोलाई यांच्या पूर्वी चार इतर काँग्रेस नेत्यांनी पक्षाला मोठा झटका दिला आहे. गेल्या तीन महिन्यात या पाच नेत्यांनी काँग्रेसला दे धक्का दिला आहे. काँग्रेसपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र
खासदार बोरदोलोई यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी काँग्रेसची साथ सोडताना अत्यंत दुख होत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या सर्व पदांचा, प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले. जेव्हा मी आमदार, खासदार आणि मंत्री झालो, तेव्हापासून राज्याचे हित हीच माझी प्राथमिकता राहिली. आसामाचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. मी राज्याच्या प्रगतीसाठी नेहमी योगदान देत आलो आहे. जेव्हा मला दाबल्यासारखे वाटते, प्रगती होत नसल्याचे जाणवते, तेव्हा मी असा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःला चांगल्या वातावरणात नेण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे अजूनही आसाममधील लोकांची सेवा करण्यासाठी अनेक वर्षे आहेत, असेही त्यांनी या पत्रात सूचित केले.
या नेत्यांनी सोडली पक्षाची साथ
रेजाऊल करीम सरकार हे या 11 जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि अवघ्या काही दिवसात त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. करीम सरकार हे आसाम अल्पसंख्यांक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. ते दोन दशकांपासून या संघटनेशी संबंधित होते. त्यांनी आता काँग्रेसकडेही पाठ फिरवली आहे.
या नंतर काँग्रेसला सर्वात फटका हा फेब्रुवारी महिन्यात बसला. आसामचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन कुमार बोराह यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली. ते काँग्रेस पक्षाचे दोनदा आमदार होते. बोराह यांनी अनेक पद भुषवली. त्यांनी चार वर्षे पक्षाचे नेतृत्वही केले. स्वतःची प्रतिष्ठा आणि पक्षाच्या निर्णयांना विरोध करत त्यांनी काँग्रेसची साथ सोडली. काँग्रेस सोडल्यानंतर बोराह यांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि भाजप प्रदेश अध्यक्ष दिलीप सैकिया यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तीन दशकांपासून बोराह हे काँग्रेसचे चेहरा होते.
अबुल मिया हे सुद्धा काँग्रेसचा चेहरा होते. त्यांनी काँग्रेसची साथ सोडत रायजोर पक्षात प्रवेश केला. धुबरी जिल्ह्यात अबुल मिया यांच्या मोठा प्रभाव आहे. त्यांची या मतदारसंघावर मोठी पकड आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर दीर्घकाळ काम केले आहे. त्यांनी साथ सोडल्याने काँग्रेसला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर 7 मार्च रोजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते रतुल कलिता यांनी सुद्धा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा झटका बसला. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष गौरव गोगोई आणि इतर नेत्यांवर आरोपांची राळ उडवून दिली. काँग्रेसमध्ये केवळ मंत्री, वरिष्ठ नेते यांच्या पुत्रांनाच पुढे करण्यात येते. सर्वसामान्यांना कोणतीही मोठी संधी देण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला.