जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय, केली मोठी घोषणा

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव विचारत त्यांच्यावर गोळीबार केला.

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय, केली मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2025 | 3:23 PM

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव विचारत त्यांच्यावर गोळीबार केला, या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. या कठीण परिस्थितीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी एअर इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे.

पर्यटकांना दिलासा देण्यासाठी एअर इंडियानं मोठी घोषणा केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या एखाद्या प्रवाशाला जर आपली फ्लाइट रीशेड्यूल करायची असेल तर त्यावर कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही, तसेच ज्या प्रवाशांना आपलं विमान तिकीट रद्द करायचं असेल तर त्यांना पूर्ण रिफंड दिला जाईल, त्यावर कोणताही चार्ज आकारला जाणार नाही, असं एअर इंडियानं म्हटलं आहे.

एअर इंडियाची ही विशेष सवलत 30 एप्रिल 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. श्रीनगरवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व फ्लाइटसाठी ही सुविधा देण्यात आली आहे. श्रीनगरमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळावा, त्यांची मदत व्हावी या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्या प्रवाशांना आपली फ्लाइट रीशेड्यूल करायची असेल तर त्यावर कोणताही चार्ज आकराला जाणार नाही असं एअर इंडियानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. पर्यटकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे, त्यामुळे जर आपली ट्रीप पुढे ढकलण्याचा प्रवाशांचा प्लॅन असेल तर त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

दरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी एअर इंडियाकडून हेल्पलाइन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.

011-69329333
011-69329999

या नंबरवर कॉल करून प्रवाशी आपल्या फ्लाइ़ट संदर्भात अपडेट घेऊ शकतात, तसेच रीशेड्यूलिंगची माहिती देखील त्यांना मिळेल असं एअर इंडियानं म्हटलं आहे.

26 जणांचा मृत्यू 

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला, पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला, या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.