
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान काल पूर्ण झालं असून 14 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन अंतिम निकाल लागेल. मात्र या निकालापूर्वी. विविध एजन्सींनी प्रसिद्ध केलेल्या असंख्य एक्झिट पोलपैकी एक आकडेवारी पूर्ण वेगळाच आहे. 10 प्रमुख सर्वेक्षण एजन्सींपैकी, ‘जर्नो मिरर’ हा एकमेव पोल असा आहे, ज्याच्या अंदाजाने सर्वांनाच धक्क बसला आहे. त्यांनी बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवला आहे. आत्तापर्यंत जवळजवळ सर्व इतर एक्झिट पोल एनडीएला स्पष्ट बहुमत किंवा आघाडी दाखवत असताना, ‘जर्नो मिरर’ने मात्र महाआघाडीला 130 ते 140, एनडीएला 100 ते 110 जागा०, एआयएमआयएमला 3 ते 4 जागा आणि इतर पक्षांना 3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच या सर्व्हेनुसार, आरजेडी-काँग्रेस-डावी आघाडी हे बहुमताचा आकडा (122) आरामात ओलांडतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र या अंदाजामुळे सगळेच चक्रावले आहेत.
‘जर्नो मिरर’ने असा दावा केला आहे की हा सर्व्हे 38 जिल्ह्यांच्या 150 विधानसभा क्षेत्रात 15 हजार पेक्षा अधिक मतदारांच्या मतांच्या आधारावर करण्यात आला आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील मतदारांचा कल टिपला आहे. सर्वेक्षण पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘जर्नो मिरर’चा असा दावा आहे की बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि महागाई यासारख्या मुद्द्यांवर महाआघाडीला जनतेचा पाठिंबा मिळाला आहे, तर सत्ताविरोधी लाटेचा काही प्रमाणात परिणाम सहन एनडीएला करावा लागला आहे. मात्र, याउलट, टीव्ही चॅनेल्स आणि प्रमुख सर्वेक्षण संस्थांनी एनडीएला 133 ते 167 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. याचा अर्थ असा की बिहार विधानसभा निवडणुकीत मोदी-नितीशकुमार यांची जोडी पुन्हा सत्तारूढ होऊ शकते.
महाआघाडीला तरूणांचा पाठिंबा
ग्रामीण भागात, तरुण आणि मुस्लिम-यादव लोकसंख्या महाआघाडीकडे झुकली आहे असे “जर्नो मिरर” च्या सर्वेक्षणातून दिसून आलं. तेजस्वी यादव यांनी रोजगार आणि आर्थिक मदत यासह प्रत्येक घरासाठी नोकरी देण्याच्या आश्वासनांमुळे तरुणांमध्ये आशा निर्माण झाल्या आहेत. तसेच महिला मतदारांच्या मनात एनडीचा प्रभाव मजबूत आहे, पण 18 ते 25 या वयोगटातील, तसेच नव्या मतदारांचा महाआघाडीला पाठिंबा मिळताना दिसत आहे. सीमांचल, तिरहुत आणि मगध प्रदेशात महाआघाडीला बढती मिळत असल्याचे दिसून येत आहे, तर चंपारण, पाटणा आणि नालंदा पट्ट्यांमध्ये एनडीएने आपली पकड कायम ठेवल्याचे निदर्शनास आलं. सीमांचलच्या काही जागांवर एआयएमआयएम आल्यामुळे तिरंगी लढत होऊ शकते.
स्थानिक फॅक्टरचा मोठा परिणाम
यावेळी निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर अधिक केंद्रित होती, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा एनडीएला अतिरिक्त फायदा देऊ शकला नाही असे सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून दिसून आले. नितीश कुमार यांची स्थिरतेची प्रतिमा होती, परंतु महाआघाडीने बेरोजगारी आणि शिक्षणाचे मुद्दे अधिक प्रभावीपणे मांडले. ‘जर्नो मिरर’च्या मते, राजकीय कल एनडीएकडून महाआघाडीकडे झुकत आहे, मात्र त्यांचे हे अंदाज इतर सर्वेक्षण संस्थांच्या अंदाजांपेक्षा पूर्णपणे वेगळा ट्रेंड दर्शवत आहेत.