
MIM Offer To Nitish Kumar : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जदयू, भाजपाप्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली. येथे पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार असून आरजेडी, काँग्रेसप्रणित महागठबंधनला जोरदार फटका बसला आहे. जेडीयूचे नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचे जवळपास स्पष्ट असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता एमआयएमने थेट नितीश कुमार यांच्या जेडीयूला मोठी ऑफर दिली आहे. नितीश कुमार यांनी महागठबंधनमध्ये सामील व्हावे, असे एमआयएमने म्हटले आहे. सोबतच अवघ्या पाच जागा जिंकलेल्या असल्या तरी एमआयएमने मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. या ऑफरनंतर आता बिहारच्या राजकारणात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पाच जागा जिंकल्या आहेत. सीमांलचल भागातील या जागा आहेत. याच पाच जागांच्या बळावर एमआयएम पक्षाकडू बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे.या पक्षाने आरजेडी, जेडीय पक्षांना सोबत येण्याची ऑफर दिली आहे. एमआयएमचा मुख्यमंत्री झाल्यास आम्ही नितीश कुमार यांना 2029 साली पंतप्रधानदपाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देऊ, असेही या पक्षाने म्हटले आहे.
आतादेखील सरकार स्थापन करण्याची संधी गेलेली नाही, असे एमआयएमने म्हटले आहे. जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, एमआयएम, सीपीआयएमएल, सीपीआयएम या पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर सरकारची स्थापना करता येईल. जेडीयने 85 जागांवर विजय मिळवलेला आहे. आरजेडीकडे 25 जागा आहेत. काँग्रेस आणि एमआयएमकडे क्रमश: सहा आणि पाच जगा आहेत. सीपीआयएम आणि सीपीआयएमएलने तीन जागांवर विजय मिळवलेला आहे.
या सर्वच पक्षांच्या जागांची बेरीज केली तर 124 हा आकडा होतो. बहुमतासाठी 122 जागांची गरज असते. त्यामुळे एमएयएमने सुचवल्याप्रमाणे हे सर्व पक्ष एकत्र आले तर सरकारची स्थापना करता येते, असे एमआयएमचे मत आहे. दरम्यान, हे समीकरण प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे एमआयएमच्या या ऑफरमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.