हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी आईबापाने जगावेगळा निर्णय घेतला, मुलं शोधली…
गुजरातमध्ये स्थायिक झालेले मूळच्या बिहार दाम्पत्याची जोरदार चर्चा होत आहे. या दोघांनी दोन मुलांना शोधण्यासाठी घेतलेल्या कृत्याची एकच चर्चा होत आहे.

आई-वडील मुलांसाठी काहीही करायला तयार असतात. त्यासाठी दोघेही मागे पुढे बघत नाहीत. त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली , तरी आई-वडील घाबरत नाहीत. असाच प्रकार गुजरातमधून समोर आलाय. गुजरातच्या कच्छ येथील मुंद्रा येथे मूळचे बिहारचं कुटुंब वास्तव्याला होतं. बिहारच्या या जोडप्याची दोन्ही मुले मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता होती. आई-वडिलांनी त्यांचा शोध सर्वत्र घेतला. परंतु दोघेही सापडले नसल्याने त्यांनी शेवटी पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतरही दोघे जण सापडले नाहीत. अखेर मुलांना शोधण्यासाठी आई-वडिलांनी भिकाऱ्यांचा वेष धारण करत सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. आई-वडिलांनी सलग काही महिने शोध घेतल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. या फिल्मी कहानीची जोरदार चर्चा होत आहे.
बिहारचं कुटुंब कामाच्या शोधात गुजरातमध्ये स्थलांतरित झालं होतं. बिहारच्या जोडप्याला दोन मुले होते. मोठ्या मुलाचं नाव राहुल (वय 14) होतं. तर छोट्या मुलाचं नाव अर्पित (वय 11) होते. वडिलांनी सांगितले की, दोघे भाऊ खेळण्यासाठी घराबाहेर पडले. परंतु त्या दिवशी घरी परतलेच नाही. दोघांनी त्यांच्या मुलांची खूप शोधाशोध केली. आजूबाजूचे लोक, मित्रमंडळींकडे शोधाशोध केली. परंतु दोघे कुठेच सापडले नाही. इतकी शोधाशोध करूनही त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला. परंतु पोलिसांसोबत आई-वडिलांनी मुलांचा शोध घेण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. सलग तीन महिने दोघेही मुले कुठेच सापडले नाही. दोघांना बिहारच्या भिकारी गँगच्या लोकांनी अपहरण केल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नोकरी, काम धंदा सोडून दोघांनी भिकाऱ्यांचं रुप धारण केलं. दोघे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेशात रात्र-दिवस भटकत राहिले. दोन्ही मुले दिसतील, अशी अपेक्षा होतीच. शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा बिहारच्या भिकारी गँगमध्ये सामील झाल्याचा दाट संशय आला. दोघांनी तातडीने भीक मागत भागलपूर गाठलं. दोघे दांपत्य भीक मागत असताना त्यांचा मोठा मुलगा भागलपूरमध्ये भीक मागताना दिसला. परंतु त्याने दोघांना पाहताच घटनास्थशळावरून पळ काढला. त्यानंतर दोघांनी पुन्हा मुलाचा शोध सुरू केला. पुढे त्यांचा मोठा मुलगा बिकारनेरमध्ये सापडला. पुढे 15 दिवसांनी छोट्या मुलाला पश्चिम बंगालमधून शोधून काढलं.