Cyclone Biparjoy : बिपरजॉयमुळे २५ वर्षांपूर्वीच्या चक्रीवादळाच्या आठवणी ताज्या, 2300 जणांचा झाला होता मृत्यू

Gujarat Strong winds : गुजरातमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ धडकणार आहे. प्रचंड वेगाने त्याचा प्रवास गुजरातच्या किनारपट्टीकडे सुरु आहे. या वादळामुळे लष्कर आणि एनडीआरएफचे पथक पूर्ण अलर्टवर आहे. परंतु या प्रकारामुळे २५ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Cyclone Biparjoy : बिपरजॉयमुळे २५ वर्षांपूर्वीच्या चक्रीवादळाच्या आठवणी ताज्या, 2300 जणांचा झाला होता मृत्यू
Cyclone Biparjoy
| Updated on: Jun 15, 2023 | 5:53 PM

नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळ लवकरच गुजरातमध्ये धडकणार आहे. आता हे वादळ गुजरातच्या किनारी जिल्ह्यांच्या अगदी जवळ पोहोचला आहे. सध्या बिपरजॉय जखाऊ बंदरापासून अवघ्या 110 किलोमीटर अंतरावर असून ते ताशी 110 किलोमीटर वेगाने पुढे जात आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफचे पथक पूर्ण अलर्टवर आहे. वादळापूर्वीच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे द्वारकेतील सुमारे 38 गावांमध्ये झाडे उन्मळून पडली आहेत. बिपरजॉय आता सुपर सायक्लोन झाले आहे. यामुळे 25 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये आलेल्या वादळाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

काय झाले होते 25 वर्षांपूर्वी

9 जून 1998 रोजी आलेल्या त्या चक्रीवादळाच्या आठवणीने आजही अनेकांचा थरकाप उडतो. गुजरातमधील कांडला बंदरात लोक त्या दिवशी नियमित कामे करीत होते. दुपारनंतर परिस्थिती बदलू लागली. प्रथम ताशी 150 किमी वेगाने वारे वाहत होते आणि थोड्याच वेळात त्यांचा वेग 160 ते 180 किमी प्रतितास इतका झाला. अरबी समुद्रात कमी दाबामुळे चक्रीवादळ जमिनीवर आले.

मृतांचा आकडा खूप मोठा

चक्रीवादळामुळे 2,300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु ही संख्या त्यापेक्षा जास्त असेल. मृतांची संख्या प्रामुख्याने कांडला, गांधीधाममध्ये आहे. जामनगरजवळ दोन-तीन जहाजेही बुडाली. कांडला गांधीधाम संकुलात एकच स्मशानभूमी होती. तेव्हा इतके मृतदेह स्मशानभूमीत पोहोचले की परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून एका ठिकाणी जमा करण्यात आला.

स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या रिकाम्या जागा पेट्रोल आणि डिझेल शिंपडून पेटवण्यात आल्या. यादरम्यान वाराही इतका जोरात होता की मृतदेहांच्या हाडे समुद्रातून महामार्गावर विखुरल्या गेल्या. 9 जून रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे 1 ऑगस्टपर्यंत मृतदेह सापडत होते यावरूनच हे वादळ किती भयंकर होते याचा अंदाज लावता येतो. पाकिस्तानच्या किनारपट्टीवरही काही मृतदेह सापडले आहेत.

सुमारे महिनाभर कांडलाजवळील बेटावर मृतदेह येत राहिले. डझनभर मृतदेह समुद्रात तरंगत मांडवीच्या काठावर पोहोचले होते. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन नव्हते. वादळानंतर किनाऱ्यावर चिखल झाला होता. स्थानिक लोकांनी चिखलात शोध घेतला असता त्यांना शेकडो मृतदेह सापडले.

ही ही वाचा

Cyclone Biparjoy : बिपरजॉय सुपर होतोय सायक्लोन, 100 ते 150 KM हवेचा वेग किती घातक

Cyclone Biparjoy : ‘बिपरजॉय’ नाव कसे पडले? कोणी दिले चक्रीवादळाला नाव