हरियाणात भाजप सरकार अल्पमतात? विरोधकांचं राज्यपालांना पत्र
हरियाणात राजकीय संकट उभे राहिले आहे. ३ अपक्ष आमदारांनी सरकारला पाठिंबा काढून घेतल्याने विरोधत आता सक्रीय झाले आहेत. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षाने राज्यपालांकडे वेळ मागितली आहे.
Haryana Politics : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी पुन्हा एकदा बहुमताचा दावा केलाय. नायबसिंग सैनी यांचे सरकार अल्पमतात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदारांची संख्या मोजत भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले की, काँग्रेसकडे 30, जेजेपीकडे 10 आणि अपक्ष 3 आमदार काँग्रेससोबत आहते. यासोबतच त्यांनी बलराज कुंडू आणि अभय चौटाला यांच्यासह एकूण 45 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आमदारांची परेड आयोजित करण्याचीही चर्चा सुरू झालीये.
काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी राजीनामा द्यावे असे म्हटले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करुन नव्याने विधानसभा निवडणुका घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचे सचिव शादी लाल कपूर यांनी राजभवनाला पत्र लिहून राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज्यपालांकडे वेळ मागितला आहे. त्यासाठी राज्यपालांकडे १० मे रोजी वेळ देण्याची विनंती करण्यात आली आहे.
जेजेपीचे राज्यपालांना पत्र
हरियाणातील 3 अपक्ष आमदारांनी भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यानंतर जननायक जनता पक्षही आता सक्रिय होताना दिसत आहे. जेजेपीने राज्यपाल बंडारू दतात्रेय यांना पत्र लिहून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर योग्य निर्णय घेण्याची विनंती केली आहे. जेजेपी नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे.
3 अपक्ष आमदारांनी काढून घेतला पाठिंबा
7 मे रोजी राज्यातील तीन अपक्ष आमदारांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. पुंद्रीचे रणधीर गोलन, निलोखेरीचे धरमपाल गोंदर आणि चरखी दादरीचे सोमवीर सांगवान यांनी पाठिंबा मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा म्हणाले होते की, योग्य वेळी घेतलेला निर्णय नक्कीच फळ देईल.
हरियाणातील तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर नायबसिंग सैनी सरकारकडे केवळ 43 आमदारांचे संख्याबळ आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि रणजीत चौटाला यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या ८८ झाली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात बहुमतासाठी ४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.