इकडं चर्चा स्टारकिडच्या ड्रग्जकांडाची, तिकडे केंद्रीय मंत्रीपुत्राची, 8 जणांचा मृत्यू, 4 शेतकरी

| Updated on: Oct 04, 2021 | 12:39 AM

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत:चे सर्व कार्यक्रम रद्द करुन राजधानी लखनौ गाठलेलं आहे. तिथूनच ते सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणखी काही हिंसक घटना होऊ शकतात याचा अंदाज घेत, लखीमपूर भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय

इकडं चर्चा स्टारकिडच्या ड्रग्जकांडाची, तिकडे केंद्रीय मंत्रीपुत्राची, 8 जणांचा मृत्यू, 4 शेतकरी
उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये 4 आंदोलक शेतकरी मृत्यूमुखी, केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप
Follow us on

उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांना साधारण वर्षभराचा काळ राहिलेला असतानाच योगी सरकारचा घामटा फुटेल अशी घटना लखीमपूरमध्ये घडलीय. कारण केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर थेट गाडी घातल्याचा आरोप करण्यात येतोय. हया घटनेत एकूण 8 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचं राजकारण तापलेलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत:चे सर्व कार्यक्रम रद्द करुन राजधानी लखनौ गाठलेलं आहे. तिथूनच ते सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणखी काही हिंसक घटना होऊ शकतात याचा अंदाज घेत, लखीमपूर भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीं तसच शेतकरी नेते टिकेत हे लखीमपूरसाठी रवाना झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे याच घटनेत मृत पावलेल्यांपैकी 4 जण हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं समजतं.


नेमकी घटना काय?
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्या काही तरी बाचाबाची झाली आणि मग गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप केला गेलाय. मंत्र्याच्या मुलाचं नाव आशिष मिश्रा असं आहे. तर आंदोलक शेतकऱ्यांनीच आधी दगडफेक केली आणि त्यातूनच मग वाद वाढत गेला. त्याच घटनेत भाजपच्या 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. ह्या घटनेनंतर आंदोलकांनी भाजप नेत्यांच्या गाड्यांची जाळपोळ केली. आधी आंदोलकांनी दगडफेक केली की आधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली यावर आरोप प्रत्यारोप आता सुरु झालेत. पण ह्या घटनेमुळे योगी सरकारला संकटात टाकल्याचं दिसतंय.


मंत्रीपूत्र काय म्हणतो?
लखमीपूरच्या ह्या घटनेवर मंत्री अजय मिश्रा काय म्हणाले ते नंतर पाहुया, आधी त्यांचा आरोप असलेला मुलगा आशिष मिश्रा काय म्हणाला ते पाहुया- आशिष मिश्रानं दावा केलाय की, जी गाडी शेतकऱ्यांच्या अंगावर घातली गेली, त्या गाडीत तो नव्हताच. मी सकाळी 9 पासून ते कार्यक्रम संपेपर्यंत बनवारीपूरलाच होतो. ह्या घटनेत माझ्यावर जे आरोप करण्यात येतायत ते पूर्णपणे आधारहीन आहेत आणि ह्या घटनेचा न्यायिक तपास करण्यात यावा अशी मी मागणी करतो असं आशिष मिश्रांनी म्हटलंय.


मंत्रीमहोदय काय म्हणतात?
काही काळापूर्वीच मंत्री अजय मिश्रा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात ते आंदोलक शेतकऱ्यांना दो मिनट लगेंगे ठिक करने मे असं धमकावत असल्याचं जाहीर व्हायरल झालं होतं. त्याच मंत्री अजय मिश्रांवर आता आंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या घटनेला महत्व आलंय. पण त्यावर स्पष्टीकरण देताना मंत्री अजय मिश्रा टेनी म्हणालेत- आंदोलक शेतकऱ्यांमध्ये पहिल्यापासूनच काही असामाजिक तत्व आहेत. बब्बर खालसासारख्या काही अतिरेकी संघटना गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतायत. आणि आजची घटना त्याचाच परिणाम आहे.