Rajya Sabha elections : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव महाराष्ट्राचे प्रभारी

| Updated on: Jun 01, 2022 | 3:42 PM

10 जून रोजी देशातील 15 राज्यांमधून राज्यसभेच्या 57 जागा भरण्यासाठी निवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी 1 जून रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 3 जून आहे.

Rajya Sabha elections : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव महाराष्ट्राचे प्रभारी
भाजप
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) सज्ज दिसत असून केद्रासह राज्यातील नेते यासाठी तयारीला लागले आहेत. तर राज्यसभा निवडणुक ही भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. महाराष्ट्राचा (Maharashtra) विचार केल्यास राज्यसभा निवडणुक ही सहा जागांसाठी होणार आहे. तर येत्या 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. ही निवडणुक सहाव्या जागेसाठी चुरस वाढणारी आहे. तर भाजपने सातवा उमेदवार दिला आहे. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राज्यसभेसाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर आता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्र्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपने नरेंद्र सिंह तोमर यांना राजस्थानचे प्रभारी बनवले आहे, तर गजेंद्र सिंह शेखावत यांना हरियाणाचे प्रभारी बनवले आहे. त्याचबरोबर पक्षाने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची महाराष्ट्राचे प्रभारी आणि जी किशन रेड्डी यांची कर्नाटक निवडणुकीच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. तर सर्व पक्ष हे राज्यांचा अभ्यास करून मैदानात उतरणार आहे.

वास्तविक, 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होत आहे. सदस्य जून ते ऑगस्ट दरम्यान वेगवेगळ्या तारखांना निवृत्त झाल्यानंतर या जागा रिक्त होत आहेत. येथे लक्षात घेण्यासारखे आहे की उत्तर प्रदेशमध्ये 11 जागा रिक्त होत आहेत. त्याचबरोबर तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी सहा जागा रिक्त होणार आहेत. याशिवाय बिहारमध्ये पाच राज्यसभा सदस्य आणि आंध्र प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी चार सदस्य निवृत्त होत आहेत. मध्य प्रदेश आणि ओडिशामधील प्रत्येकी तीन सदस्य जून ते ऑगस्ट दरम्यान निवृत्त होतील. त्याचबरोबर तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, झारखंड आणि हरियाणामधून दोन सदस्य निवृत्त होणार आहेत, तर उत्तराखंडमधूनही एक सदस्य निवृत्त होणार आहे.

राजस्थान-हरियाणामध्ये काट्याची लढत

भाजपने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि गजेंद्र सिंह शेखावत यांची आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी अनुक्रमे राजस्थान आणि हरियाणाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजप समर्थित अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही लढत जवळची आणि रोचक बनली आहे. निवेदनानुसार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीचे प्रभारी बनवण्यात आले आहे. या राज्यातही राज्यसभा निवडणुकीत निकराची लढत पाहायला मिळू शकते. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांची कर्नाटकातील राज्यसभा निवडणुकीसाठी प्रभारी नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाने सांगितले आहे.

राज्यसभा निवडणुकीचा निकाल 10 जूनला

10 जून रोजी देशातील 15 राज्यांमधून राज्यसभेच्या 57 जागा भरण्यासाठी निवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी 1 जून रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 3 जून आहे. 10 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. यावेळी राज्यसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गज रिंगणात आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रमुख के. लक्ष्मण, काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला, अजय माकन आणि राजीव शुक्ला आणि मीडिया व्यावसायिक सुभाष चंद्रा यांचा 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

भाजपवर घोडेबाजार करण्याचा आरोप

तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीतही ते तपास यंत्रणांचा वापर करतील याची मला चिंता वाटते. घोडेबाजार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांचे घोडे कितीही उधळू द्या, आम्हीच जिंकणार आहोत. जिंकण्यासाठी जी मते हवी आहेत, ती आमच्याकडे आहेत, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. ते आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी भाजपला फटकारलं. तसेच राज्यसभेची उमेदवारी कुणाला द्यावी आणि कुणाला नाही हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी फारसा बोलणार नाही, असंही राऊत यांनी सांगितलं.