दिल्लीत एक रुम मिळणेही कठीण, BRICS परिषदेमुळे बड्या हॉटेल फुल्ल, एका रात्रीचे भाडे ऐकून चक्करच येईल
BRICS Summit 2026: दिल्लीतील भारत मंडपम येथे 12 आणि 13 सप्टेंबर रोजी 18 वे ब्रिक्स सम्मेलन होत आहे. यामुळे देशाच्या राजधानीतील सर्व बडी हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. येथील एका रुमचे भाडे ऐकून तुमचा कानावर विश्वासच बसणार नाही.

राजधानी दिल्लीत 18 वी ब्रिक्स (BRICS) शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीतील पंचतारांकित आणि आलिशान हॉटेल्समधील खोल्यांचे दर गगनाला भिडले आहे. ब्रिक्स देशातील राष्ट्राध्यक्ष, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि बडे अधिकारी यांच्यासाठी खोल्या अगोदरच बुक करण्यात आल्या आहेत. परिणामी हॉटेल्समध्ये खोल्यांचा तुटवडा झाला आहे. अनेक बड्या हॉटेल्सनी बुकिंग पोर्टलवर दोन दिवसांसाठी बुकिंग बंद केले आहे. या घडामोडींमुळे एका रात्रीसाठी खोलीचे दर विक्रमी पातळीवर पोहचले आहे. रुम भाड्यात तीन पट वाढ झाली आहे.
एका रात्रीच्या किरायापोटी मोजा 14 लाख रुपये
ब्रिक्स शिखर परिषदेसाठी अनेक पंचतारांकित आणि बड्या हॉटेल्स बुक करण्यात आल्या आहेत. आलिशान हॉटेल्समधील खोल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. खोल्यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. एका रात्रीसाठी खोल्यांच्या दरात तिप्पट वाढ झाली आहे. काही हॉटेल्समध्ये एका रात्रीचे भाडे थेट 14.45 लाख रुपयांपर्यंत पोहचले आहे. यामुळे इतर पर्यटक, व्यापारी, व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.
दहा दिवसांअगोदरच बुकिंगमुळे भाडे महागले
5 स्टार हॉटेल्समधील खोल्या गेल्या दहा दिवसांपूर्वीच आरक्षित झाल्या आहेत. ताज महल आणि ताज पॅलेस या हॉटेल्समध्ये पुढील आठवड्यातील तीन दिवस खोल्या उपलब्ध नाहीत. 10 सप्टेंबरसाठी ताजमधील सर्वात महागड्या सुटचे भाडे एका रात्रीसाठी 14.45 लाख रुपये इतके असल्याची माहिती समोर यते आहे. चाणक्यपुरी येथील द लीला पॅलेस आणि द ओबेरॉय या हॉटेल्सने ब्रिक्समुळे ऑनलाईन बुकिंग बंद केले आहे. द इम्पेरिअल हॉटेलमध्येही 10 -13 सप्टेंबर या काळात खोल्या शिल्लक नाहीत.
तर आयटीसी मौर्यामध्ये 12 सप्टेंबरसाठी खोली दर 2.55 लाखांपर्यंत पोहचल्याचे समोर आले आहे. याशिवाय शांग्री-ला ईरोस, ले मेरिडियनपासून इतर हॉटेल्समध्येही खोल्यांचे दर महागले आहे. तर इतर फोर स्टार आणि थ्री स्टार हॉटेल्समध्ये भाडेवाढ झाली आहे.
महत्त्वाच्या तारखांना रूमच उपलब्ध नाही
भारत मंडमप येथे ब्रिक्स शिखर परिषद होत आहे. 11 ते 13 सप्टेंबर या दरम्यान दिल्लीतील जवळपास सर्वच आलिशान हॉटेल्स पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. अनेक हॉटेल्सनी या काळात ऑनलाईन बुकिंग पूर्णपणे बंद केले आहे. तर काही हॉटेल्समध्ये रूम उपलब्ध असल्या तरी भाडे, किराया वाढला आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे दिल्लीतील हॉटेल उद्योगाला बहर आला आहे. त्यांना आर्थिक बळ मिळाले आहे.