
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डोकलाममध्ये चिनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी एका पुस्तकाचा हवाला देऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर सरकारच्यावतीने सभागृहात सांगण्यात आलं की, ‘राहुल गांधी ज्या पुस्तकाच्या आधारे आरोप करतायत, ते प्रकाशितच झालेलं नाही’. ‘मला वेळ दिल्याबद्दल सभागृहाचे धन्यवाद’ असं राहुल गांधी भाषणाची सुरुवात करताना म्हणाले. “काँग्रेसवर अनेक आरोप करण्यात आले आहेत, त्यावर मी आता बोलणार नाही. त्याऐवजी मी काही वाचून सुरुवात करतोय. माजी लष्करप्रमुख नरवणे यांचं हे पुस्तक आहे. तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका मी काय वाचतोय. यावरुन समजेल कोण देशभक्त आहे कोण नाही” असं राहुल गांधी म्हणाले.
संसदेत आपला मुद्दा मांडताना राहुल गांधी यांनी डोकलामचा मुद्दा उपस्थित केला. यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोध केला. ‘राहुल गांधी जे बोलतायत, ज्या पुस्तकावरुन ते बोलतायत. ते प्रकाशितच झालेलं नाही’ असं राजनाथ सिंह म्हणाले.
त्यावर बोलू नये
‘4 चिनी रणगाडे डोकलाम येथे भारताच्या भूमीवर येत होते. ते 100 मीटर दूर होते’ असं राहुल गांधी मेमोइर वाचताना म्हणाले. त्यावर राजनाथ सिंह लगेच उठून उभे राहिले व बोलले की, ‘जे पुस्तकच प्रकाशित झालं नाही, त्यावर बोलू नये’ राजनाथ सिंह यांनी उभं राहून राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि पुस्तकाचा विरोध केला. राजनाथ सिंह बोलले की, “राहुल गांधी ज्या पुस्तकाचा उल्लेख करतायत ते कधी प्रकाशितच झालेलं नाही. त्या पुस्तकात काय लिहिलय हे कसं मानायचं?”
मी जे म्हणतोय ते सर्व..
लोकसभेत एनडीए आणि विरोधी पक्षांमध्ये गदारोळ सुरु झाला. या दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी संरक्षण मंत्र्यांशी सहमती व्यक्त केली. राहुल गांधी म्हणाले की, “मी जे म्हणतोय ते सर्व नरवणे बोलले आहेत. त्यांचं पुस्तक प्रकाशित होऊ दिलं नाही”
एक कोट वाचण्यावर इतके घाबरतात
राजनाथ सिंह म्हणाले की, “ते पुस्तक तथ्यावर आधारित असतं तर पब्लिश करु दिलं असतं. त्यातली तथ्य चुकीची होती. याच कारणामुळे ते पुस्तक प्रकाशित होत नाहीय” राहुल गांधी म्हणाले की, “सत्ताधारी म्हणतात की ते दहशतवादा विरुद्ध लढतायत. पण एक कोट वाचण्यावर इतके घाबरतात. यात असं काय आहे, ज्याला इतके घाबरतायत. ही भिती नसेल तर मला बोलू द्या. वास्तवात हे लोक घाबरलेले आहेत. मी जे बोलतोय ते चीनशी संबंधित आहे. जे डोकलाममध्ये चीनने भारतासोबत केलं”