जेएनयूमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमात राडा, डावे आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते भिडले; नेमकं काय घडलं?

एबीव्हीपीने डाव्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही शिवजयंती साजरी करत होतो. परंतु, जेएनयूएसयूच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या फोटोवरील हार काढून फेकला. त्यामुळेच वाद सुरू झाला, असं एबीव्हीपीचं म्हणणं आहे.

जेएनयूमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमात राडा, डावे आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते भिडले; नेमकं काय घडलं?
Shivaji Maharaj portrait
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 20, 2023 | 6:43 AM

नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू)मध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. रविवारी जेएनयूच्या छात्र संघ कार्यालयात डाव्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या फोटोवरील हार काढला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोंसह इतर महापुरुषांचा फोटो डाव्या कार्यकर्त्यांनी फेकल्याचा आरोप एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या कारणावरूनच डावे आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एबीव्हीपीने या घटनेचं ट्विटही केलं आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, या वादावर विद्यापीठाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र, या प्रकारामुळे विद्यापीठात तणाव आहे.

या वादानंतर एबीव्हीपीने एक ट्विट करून डाव्या कार्यकर्त्यांवर आरोप केले आहेत. या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा खाली पडलेली दिसत आहे. जमिनीवर फुलेही अस्तव्यस्त पडलेली दिसत आहेत. जेएनयूच्या छात्र संघ कार्यालयातून डाव्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरील हार काढला. त्यानंतर त्यांनी तोडफोड सुरू केली. तिथे असलेल्या महापुरुषांचे फोटो फेकले. अभाविप या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहे. तसेच दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे, असं एबीव्हीपीच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

डाव्यांचं म्हणणं काय?

एबीव्हीपीच्या दाव्यानंतर डाव्यांनीही आपली बाजू मांडली आहे. एबीव्हीपी कार्यकर्त्यांनीच गोंधळ घातला आणि मारहाण केली. एबीव्हीपीने पुन्हा एकदा राडा करण्यास सुरुवात केली आहे. दर्शन सोळंकीच्या वडिलांच्या सांगण्यावरून कँडल मार्च काढण्यात आला होता.

दर्शन सोळंकी बॉम्बे आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहे. जातीयवादी लोकांनी त्यांना मारलं होतं. आमच्या या शांती मार्चला एबीव्हीपीने पूर्ण होऊ दिलं नाही. त्यांनी आमचा मार्च थांबवण्याचा प्रयत्न केला, असं डाव्यांनी म्हटलं आहे.

 

आरोप फेटाळले

दरम्यान, एबीव्हीपीने डाव्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही शिवजयंती साजरी करत होतो. परंतु, जेएनयूएसयूच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या फोटोवरील हार काढून फेकला. त्यामुळेच वाद सुरू झाला, असं एबीव्हीपीचं म्हणणं आहे. दरम्यान, या घटनेवर कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या घटनेनंतर जेएनयूमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.