CJP Protest : सीजेपीच्या नव्या पोस्टने मोठं वादळ, सरकारला फुटला घाम; एका मागणीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!
आता दास यांच्या या पोस्टमुळे देशात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? सरकार हे गुन्हे मागे घेणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. प्रधान यांचा हा राजीनामा म्हणजे सरकारवर आलेली नामुष्की असल्याचे बोलले जात आहे. सर्व अटी मान्य केल्यानंतरच कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आपले आंदोलन मागे घेतले होते. हे आंदोलन मागे घेताना सरकारने कोणत्याही आंदोलकावर गुन्हा दाखल होणार नाही, असे आश्वासन दिले होते. तसेच देशातील कोणत्याही भाजपाशासित राज्यात आंदोलकांविरोधात कारवाई केली जाणार नाही, असेही आश्वासन सरकारने दिले होते. परंतु आता कॉकरोच जनता पार्टीने सरकारवर गंभीर आरोप केले आहे. अनेक भाजपाशासित राज्यांत आमच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, असं सीजेपीने म्हटलंय. सीजेपीच्या या आंदोलनामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
नेमका आरोप काय?
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी त्यांच्या एक्स खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आमच्या आंदोलकांवर देशात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप केलाय. तसेच दास यांनी मोदी सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. आमच्यापर्यंत विद्यार्थी आणि इतर आंदोलनकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याच्या, त्यांना ताब्यात घेतल्याच्या किंवा विविध राज्य यंत्रणांकडून अटक केल्याच्या अनेक बातम्या पोहोचत आहेत. विशेषतः आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारमधून येणारी माहिती अत्यंत चिंताजनक आहे, असे दास म्हणाले आहेत.
आम्हाला दिले होते आश्वासन-सीजेपी
कॉकरोच जनता पार्टीने देशव्यापी आंदोलन केवळ भारत सरकारने दिलेल्या आश्वासनानंतरच स्थगित केले होते. सरकारने आम्हाला आश्वासन दिले होते की, कोणत्याही आंदोलनकर्त्यावर आता किंवा भविष्यात, कोणत्याही भाजप किंवा एनडीए-शासित राज्यात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे या राज्यांमधून येणारे अहवाल अत्यंत गंभीर चिंतेचा विषय आहेत, असं दास आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
सक्षम वकिलांशी समन्वय साधत आहोत
आमची कायदेशीर टीम संबंधित राज्यांतील सक्षम वकिलांशी समन्वय साधत आहे. ताब्यात घेतलेल्या किंवा अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची आणि आंदोलनकर्त्यांची सुटका करून घेण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिलीय.
🚨STATEMENT
We are deeply concerned by multiple reports reaching us of students and other protestors being targeted, detained, or arrested by various state agencies, particularly in Assam, West Bengal, and Bihar.
The Cockroach Janta Party had called off its nationwide protest…
— Saurav Das (@SauravDassss) July 27, 2026
जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना आवाहन
दास यांनी आपल्या पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री जेपी नड्डा तसेच डॉ. जितेंद्र सिंह यांचेही नाव घेतले आहे. जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांना आवाहन करतो की, त्यांनी आम्हाला दिलेले आश्वासन तातडीने पाळावे. देशभरात ज्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांची त्वरित सुटका व्हावी आणि कोणत्याही आंदोलनकर्त्याविरुद्ध दबावाचे किंवा सूडबुद्धीने केले जाणारे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही याची खात्री करावी, अशी मागणी दास यांनी केली आहे.
दरम्यान, आता दास यांच्या या पोस्टमुळे देशात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? सरकार हे गुन्हे मागे घेणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.