केजरीवाल का बसलेत ध्यानाला? आत्मचिंतन की विचारमंथन?

आज सकाळपासूनच अरविंद केजरीवाल ध्यानधारणेला बसले आहेत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते ध्यानात बसतील.

केजरीवाल का बसलेत ध्यानाला? आत्मचिंतन की विचारमंथन?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2023 | 11:38 AM

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर दिल्लीतील आप सरकार असतानाच अरविंद केजरीवाल यांनी अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे आज ध्यानधारणेला बसले आहेत. आज सकाळीच अरविंद केजरीवाल यांनी ध्यान करायला सुरुवात केली आहे. पाच मिनिटं, अर्धा-एक तास नव्हे तर तब्बल सात तास हे ध्यान चालणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सीबीआयने अटक केली आहे. दिल्लीत शाळा आणि रुग्णालय तयार करणाऱ्यांना पंतप्रधान जेलमध्ये पाठवत आहेत, आणि कोट्यवधी रुपये लुटणाऱ्यांना जवळ करत आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केलाय. याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी केजरीवाल ध्यानधारणेसाठी बसले आहेत.

देशासाठी चिंता

दिल्लीतील अबकारी धोरणात गैरव्यवहार केल्याचा ठपका दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोजिया यांच्यावर ठेवण्यात आलाय. त्यांना सध्या सीबीआयने अटक केली आहे. केवळ दिल्लीतच नव्हे तर भाजपाला विरोध करणाऱ्या देशातील बड्या नेत्यांविरोधात अशीच कारवाई केली जात आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. देशातील लोकशाहीबद्दल चिंता वाटत असल्याने होळीनंतर ध्यान धारणा करणार असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं होतं. ही देशासाठीची पूजा आणि प्रार्थना असल्याचं ते म्हणाले आहेत.

सायंकाळी 5 वाजेपर्यंत ध्यान

अरविंद केजरीवाल म्हणाले, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे धाडसी नेते आहेत. देशासाठी ते प्राणही देऊ शकतात. पण आज देशातील स्थितीबाबत मला चिंता वाटतेय. होळीनंतर मी संपूर्ण देशासाठी ध्यानधारणा करेल, असं केजरीवाल यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आज सकाळपासूनच अरविंद केजरीवाल ध्यानधारणेला बसले आहेत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते ध्यानात बसतील.

विरोधकांची एकजूट वाढतेय

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपविरोधात देशातील विरोधकांची एकजूट हळू हळू वाढताना दिसत आहे. देशातील 9 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतच पत्र लिहिलं होतं. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिसेना प्रमुख उद्धव ठाकरे, सपाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, नॅशनल काँफरन्सचे फारुख अब्दुल्ला तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश आहे. काँग्रेसने या पत्रप्रपंचापासून अंतर राखल्याची माहिती आहे. मनिष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर विरोधकांनी हे पत्र लिहिलं होतं. मनिष सिसोदिया हे लोकप्रतिनिधी असून तपास एजन्सीला नेहमीच सहकार्य करतात, त्यांच्या अटकेची गरज नव्हती, असा उल्लेख या पत्रात होता. विरोधकांच्या या एकजुटीता आता केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनीही अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर केला आहे.