Farmer Protest | दिल्लीतील आंदोलनातून परतलेल्या पंजाबच्या शेतकऱ्याची आत्महत्या

| Updated on: Dec 20, 2020 | 8:22 PM

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आलेल्या एका शेतकऱ्याने पंजाबला गेल्यानंतर आत्महत्या केली आहे.

Farmer Protest | दिल्लीतील आंदोलनातून परतलेल्या पंजाबच्या शेतकऱ्याची आत्महत्या
Follow us on

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आलेल्या एका शेतकऱ्याने पंजाबला गेल्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा शेतकरी 2 दिवसांपूर्वीच दिल्लीतील आंदोलनातून परत पंजाबला आपल्या घरी आला होता. मृत 22 वर्षीय शेतकऱ्याचं नाव गुरलाभ सिंग असं आहे. तो बठिंडा जिल्ह्यातील दयालपुरा मिर्जा या गावातील रहिवासी होता. तो 18 डिसेंबरला आंदोलनावरुन परतला होता (Delhi Farmer Protest Updates one Punjab farmer suicide after returning to home).

तरुण शेतकरी गुरलाभने शनिवारी (19 डिसेंबर) आपल्या घरी विषारी पदार्थ खाऊन आपली जीवनयात्रा संपवली. विष खाल्ल्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गुरलाभवर 6 लाख रुपयांचं कर्ज असल्याचंही सांगितलं जातंय. असं असलं तरी त्याच्या आत्महत्येचं निश्चित कारण अद्याप समजलेलं नाही.

23 डिसेंबरला एक दिवस अन्नत्याग करण्याचं शेतकऱ्यांचं आवाहन

दरम्यान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह देशभरातील हजारो शेतकरी 26 नोव्हेंबरपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. हे कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत, असा आरोप शेतकरी आंदोलक करत आहेत. या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) आज (20 डिसेंबर) 25 वा दिवस आहे. सध्यातरी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. दुसरीकडे शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली देत आहेत.

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत म्हणाले, “जोपर्यंत सरकार नवे कृषी कायदे मागे घेत नाही आणि किमान आधारभूत किमतीवर (MSP) कायदा होत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन मागे घेणार नाही. 23 डिसेंबरला शेतकरी दिवसाच्या निमित्ताने देशभरातील नागरिकांनी एकावेळी अन्नत्याग करुन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा.”

गाजियाबादमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. हे शेतकरी मेरठवरुन दिल्लीकडे येत होते. अर्थला कटवर पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर झटापट झाली. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.

हेही वाचा :

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार?

भाजपचा अजून एक मित्रपक्ष दुरावणार?, बेनिवाल 2 लाख शेतकऱ्यांसह दिल्लीकडे कूच करणार

तुम्ही ‘ट्रॉली टाईम्स’ वाचलाय? शेतकरी आंदोलकांनीच सुरु केलेला पेपर काय छापतो? वाचा…

Delhi Farmer Protest Updates one Punjab farmer suicide after returning to home