
हवाई प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि वेळ वाचवणारा प्रवास मानला जातो. मात्र हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानाला उड्डाण करण्याची कायदेशीर परवानगी नसणे ही धक्कादायक बाब आहे. ही केवळ एक कल्पना नाही तर देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियासोबत घडलेली एक घटना आहे. एअर इंडियाने त्यांचे एअरबस विमान एकदा-दोनदा नाही तर 8 वेळा आवश्यक फिटनेस प्रमाणपत्राशिवाय उडवल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी झालेल्या या छेडछाडीविरुद्ध नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आता एअर इंडियावर दंडात्मक कारवाई केली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
भारतातील विमान वाहतुकीवर DGCA चे नियंत्रण आहे. DGCA ने एअर इंडियाला अंदाजे 1 कोटी 10 लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या एअरबस ए320 विमानाने 24 ते 25 नोव्हेंबर दरम्यान दिल्ली, बेंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रवाशांना प्रवास करून नेले. मात्र या विमानाकडे एअरवर्थिनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट (एआरसी) नव्हते.
विमान योग्य आणि उड्डाणासाठी सुरक्षित आहे यासाठी एअरवर्थिनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सुरक्षा आणि तांत्रिक तपासणीनंतरच DGCA कडून दरवर्षी ही परवानगी दिली जाते. मात्र या प्रमाणपत्राशिवाय या विमानाने उड्डाण केल्याचे समोर आले आहे.
एअर इंडियाच्या एअरबस ए320 विमानाकडे एअरवर्थिनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट नव्हते हे एअरलाइनच्या कार्यप्रणालीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते. एअर इंडियाने कबूल केले आहे की हे एक “सिस्टमिक अपयश” आहे. आता तपासत असे आढळले आहे की, आठ उड्डाणे करणाऱ्या वैमानिकांनी टेकऑफ करण्यापूर्वी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) पाळल्या नाहीत. जर वैमानिकांनी टेकऑफपूर्वी चेकलिस्ट तपासली असती तर कदाचित या विमानाने हवेत उड्डाण केले नसते.
आता DGCA कडून एअरलाइनला 30 दिवसांच्या आत दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 5 फेब्रुवारी याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. डीजीसीएचे सहमहासंचालक मनीष कुमार यांनी एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांना यासाठी जबाबदार धरले आहे.