मोदी सरकारचं टेन्शन वाढलं, आता दिमागी नक्षल मैदानात; थेट अभिजीत दीपकेंचा फॉर्म्युला वापरला
मोदी सरकारचं पुन्हा टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. सीजेपीनंतर आता दिमागी नक्षल मैदानात; थेट अभिजीत दीपकेंचा फॉर्म्युला वापरला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता ‘दिमागी नक्षल’वरून सोशल मीडियावर वातावरण पेटलं आहे. अभिजीत दीपके यांच्या सारखाच फॉर्म्युला वापरून ‘दिमागी नक्षल जनता पार्टी’ मैदानात उतरली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे दिमागी नक्षल जनता पार्टी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. या दिमाग नक्षल जनता पार्टीने अवघ्या 24 तासांत सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्या रत्ना सिंह यांनी म्हटलं की, मोदींनी ‘दिमागी नक्षल’चा उल्लेख केला होता. सर्व दिमागी नक्षली एकत्र आल्यास काय होईल? खरंतर याच वाक्याने अभिजीत दीपके यांनी चळवळीचा पाया घातला. सीजेपीमुळे पहिल्यांदाच मोदी सरकारमधील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला’. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान कॉक्रोच शब्दाचा वापर केला होता. त्यावेळी अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर एक प्रश्न विचारला होता. सर्व कॉक्रोच एकत्र आले तर काय होईल? असा सवाल दीपकेंनी यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हे पेज तयार केले होते. या पेजने अवघ्या काही दिवसांत काँग्रेस आणि भाजपच्या सोशल मीडिया फॉलोवर्सला मागे टाकलं होतं. आता दिमागी नक्षल जनता पार्टीचेही सोशल मीडियावर फॉलोवर्स वाढताना दिसत आहेत.
‘दिमागी नक्षल’वरून सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या वक्तव्यावरून रत्ना सिंह यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अंकुर नावाच्या एका युजरने म्हटलं आहे की, ‘आयडिया अशीच आहे की, सर्व दिमागी नक्षली बाहेर यावेत. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हावी’. काही लोकांनी म्हटलं की, ‘सर्व भाजप समर्थक, राष्ट्रभक्त किंवा संघी एकत्र आल्यावर काय होईल, अशी टिप्पणी केली आहे. एकाने म्हटलं की, ‘दिमागी नक्षली’ असल्याचा अभिमान आहे. प्रश्न विचारल्याने आम्ही दिमागी नक्षली ठरत असू, तर त्या यादीत माझेही नाव घ्यावे. मी रत्ना सिंह यांच्यासोबत आहे. आमच्याकडे विचार करण्याची बुद्धी आहे’.