दर्यादिली… 1500 पाहुणे, पंचपक्वान्न अन् रोषणाई… तृतियपंथीय पूनमबाईची मानलेल्या मुलीच्या लग्नावर लाखोंची उधळण

राजस्थानच्या फतेहपूर शेखावटी येथे एका तृतियपंथी पूनमबाईने मानलेल्या मुलीच्या लग्नावर दहा लाख रूपये खर्च केले आहेत. एका तृतियपंथी महिलेने एखाद्याच्या लग्नावर एवढा खर्च करण्याची ही आगळीवेगळी घटना आहे.

दर्यादिली... 1500 पाहुणे, पंचपक्वान्न अन् रोषणाई... तृतियपंथीय पूनमबाईची मानलेल्या मुलीच्या लग्नावर लाखोंची उधळण
daughters marriage
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 01, 2023 | 2:00 PM

जयपूर : आपल्याकडे आजही तृतियपंथीयांचा तिरस्कार केला जातो. त्यांना मानसन्मान दिला जात नाही. त्यांच्या रोजीरोटीच्या प्रश्नावरही कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाही. सदैव बहिष्कृत म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्यात कोणी मिसळत नाहीत आणि त्यांनाही मिसळून घेत नाही. पण ते तृतियपंथीय असले तरी त्यांनाही भावना असतात. त्यांच्याही मनात नात्याचा ओलावा असतो. हे कुणी समजूनच घेत नाही. याच तृतियपंथीयांमधील मानवतेचं दर्शन घडवणारी एक गोष्ट राजस्थानमध्ये घडली आहे. तीही एका लग्नाच्या निमित्ताने.

राजस्थानच्या फतेहपूर शेखावटी येथे ही घटना घडली आहे. फतेहपूर शेखावटी येथे राहणाऱ्या पूनमबाई या तृतियपंथीयाने मानलेल्या मुलीच्या लग्नावर लाखो रूपये खर्च केले आहेत. तिचीही दर्यादिली पाहून पंचक्रोशीत पूनमबाईची वाहवा केली जात आहे. पूनमबाईने एका गरीब कुटुंबातील मुलीला आपली मुलगी मानलं होतं. त्यामुळे तिने या मुलीच्या लग्नाचा सर्व खर्च उचलला. पूनमबाईने या मुलीच्या लग्नावर दहा लाखाहून अधिक रक्कम खर्च केली. लग्नाला आलेल्या 1500 पाहुण्यांना पंचपक्वान्न खाऊ घातलं. तीन दिवस या लग्नाचा जल्लोष सुरू होता. घरासमोर रोषणाई करण्यात आली होती. गाणं बजावण्याचा कार्यक्रम सुरू होता. लग्नाचे सर्व रितीरीवाज धुमधडाक्यात साजरे करण्यात आले. साखरपुडाही दणक्यात करण्यता आला.

मनभरून आशीर्वाद

पूनमबाईची ही दर्यादिली पाहून नवरी मुलीनेही तिचे मनापासून आभार मानले. सासरी जाताना ती पूनमबाईच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडली. पूनमबाईने नवदाम्पत्याला मनभरून आशीर्वादही देत निरोप दिला. विशेष म्हणजे मानलेल्या मुलीसाठी पूनमबाईनेच स्वत: मुलगा शोधला होता.

अन् तिला मुलगी मानलं

फतेहपूर शेखावटी येथे इंद्रचंद सोनी यांचं चहाचं दुकान आहे. या दुकानावर पूनमबाई नेहमी यायची. इंद्रचंद यांची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याचं पूनमबाईला माहीत होतं. शिवाय इंद्रचंद यांना अन्नपूर्णा नावाची मुलगी असल्याचंही माहीत होतं. मुलीच्या लग्नासाठी इंद्रचंद चिंतीत असल्याचंही पूनमबाई जाणून होती. त्यामुळे पूनमबाईने अन्नपूर्णाला मुलगी मानलं. तिच्यासाठी स्वत: वर शोधण्यास सुरुवात केली. अन्नपूर्णासाठी ती स्थळही घेऊन आली. शहरातच राहणारे उमाशंकर यांचे चिरंजीव रजनीश याच्याशी अन्नपूर्णाचा विवाह ठरवला. स्वत: पूनमबाईने साखरपूड्याची जबाबदारी पार पाडली. लग्नात अन्नपूर्णाला लाखो रुपयांचे दागिनेही दिले.

आम्हीही माणूस आहोत

आमच्या नशिबात मातृत्वाचं सुख नाही. आम्हा तृतियपंथीयांमध्येही मातृत्वाची भावना असते. आम्हीही माणसाप्रमाणे असतो. आम्हीही याच समाजाचा भाग आहोत. मात्र दुर्देवाने आम्हाला समाजात स्थान मिळत नाही, अधिकार मिळत नाही. जेव्हा मी अन्नपूर्णाला भेटले तेव्हा मला तिच्यात माझी मुलगी दिसली. माझी मुलगी समजून मी तिचं लग्न लावून दिलं. माझ्या सख्ख्या मुलीचाच विवाह करत असल्याचं मला वाटलं, असं पूनमबाई म्हणाली.