स्वातंत्र्यदिनी गर्दी टाळा, गर्दी झाल्यास पुन्हा कोरोनाचा धोका! केंद्राच्या राज्यांना सूचना, काळजी घेण्याचं आवाहन

| Updated on: Aug 13, 2022 | 7:32 AM

Azadi ka Amrit Mahotsav : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, दिल्ली सरकारनं मास्कसक्ती पुन्हा लागू केली आहे.

स्वातंत्र्यदिनी गर्दी टाळा, गर्दी झाल्यास पुन्हा कोरोनाचा धोका! केंद्राच्या राज्यांना सूचना, काळजी घेण्याचं आवाहन
कोरोना रुग्णवाढीची धास्ती
Image Credit source: unsplash.com
Follow us on

नवी दिल्ली : पुन्हा एकदा कोरोना (India Corona News) रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्यांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनी (Independence Day News) मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यावर त्यामुळं बंधन येऊ शकतात. कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आकडा पाहता, स्वातंत्र्यदिनी शक्यतो गर्दी टाळावी, असं आवाहन केंद्राकडून राज्यांना करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करताना गर्दी झाल्यास पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढू शकतं, अशी भीती व्यक्त करण्यात आलीय. देशात सातत्यानं सरासरी 15 हजार कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कोरोना नियमांचं पालन करत स्वातंत्र्यदिन साजरा करावा, असं सांगण्यात आलंय. तशा सूचनाही राज्यांना देण्यात आल्या असून खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. आझादी का अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) या थीमवर संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळण्याची शक्यताय. त्यानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेता केंद्र सरकारकडून राज्यांना विशेष आवाहन करण्यात आलं आहे.

स्वच्छता अभियानाचं आवाहन

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना स्वच्छ भारत अभियान राबवण्याचंही आवाहन करण्यात आलंय. महिनाभर हे अभियान राबवण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, असं राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनाही सूचित करण्यात आलंय. स्वच्छ भारत मोहिमेतील लोकसहभाग वाढवण्यासाठी पावलं उचलली जावी, असेही निर्देश देण्यात आलेत.

हे सुद्धा वाचा

स्वच्छ भारत अभियान राबवण्याबाबत आवाहन करताना केंद्र सरकारनं वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरुनही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं लक्ष वेधून घेतलंय. कोरोना संक्रमण वाढू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी किंवा जमाव एकत्र येईल, अशा गोष्टी स्वातंत्र्यदिनी टाळाव्यात असं म्हटलंय. त्याचप्रमाणे कोरोना मार्गदर्शक तत्त्व पाळली जावीत, यासाठी प्रयत्न करावे, असंही आवाहन केंद्राने राज्य सरकार आणि केंद्रशासिक प्रदेशांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे.

दिल्लीत मास्कसक्ती

दोन दिवसांपूर्वीच कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, दिल्ली सरकारनं मास्कसक्ती पुन्हा लागू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आला. मास्क घातला नसेल तर पाचशे रुपये दंड आकारला जाईल, असे निर्देश दिल्ली सरकारने जारी केले होते. दिल्लीतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमुळे चिंता वाढली आहे. दिल्लीसोबत इतरही राज्यांना आता केंद्राने सतर्क केलं असून गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे.