इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी सरकारचं मोठं पाऊल, ऑपरेशन सिंधूला सुरुवात

ऑपरेश सिंधू अंतर्गत भारतीय दूतावासने 17 जून रोजी उत्तर इराणमधून 110 भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे. त्यांना आर्मिनियामध्ये पोहोचण्यास मदत केली, हे विद्यार्थी उद्या भारतात येणार आहेत.

इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी सरकारचं मोठं पाऊल, ऑपरेशन सिंधूला सुरुवात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2025 | 9:14 PM

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. यामुळे मध्यपूर्वेत चांगलाच तणाव वाढला आहे. अनेक भारतीय नागरिक सध्या इराणमध्ये अडकले आहेत. या नागरिकांना पुन्हा एकदा सुरक्षीत भारतात आणण्यासाठी आता भारत सरकारकडून एक विशेष अभियान सुरू करण्यात आलं आहे. या अभियानाला ऑपरेश सिंधू असं नाव देण्यात आलं आहे. युद्धामुळे इराण आणि इस्रायलमधील परिस्थिती बिघडत चालली आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने इराणमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचललं आहे. भारतानं ऑपरेशन सिंधूला सुरुवात केली आहे. या संदर्भात भारत सरकारच्या वतीनं माहिती देण्यात आली आहे.

ऑपरेश सिंधू अंतर्गत भारतीय दूतावासने 17 जून रोजी उत्तर इराणमधून 110 भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे. त्यांना आर्मिनियामध्ये पोहोचण्यास मदत केली, हे विद्यार्थी आर्मोनियाची राजधानी असलेल्या येरेवन शहरात पोहोचले आहेत. त्यानंतर हे विद्यार्थी आज दुपारी दोन वाजता एका विशेष विमानानं येरेवनहून भारताकडे रवाना झाले आहेत. या विद्यार्थ्यांचं विमान उद्या पहाटे नवी दिल्लीमध्ये पोहोचणार आहे. भारताच्या ऑपरेशन सिंधूला सहकार्य केल्याबद्दल भारत सरकारने आर्मोनिया आणि इराण सरकारचे आभार देखील व्यक्त केले आहेत.

भारत सरकार भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, त्यासाठीच ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आलं आहे. या अंतर्गत इराणमध्ये जे भारतीय नागरिक अडकले आहेत, त्यांना आधी सुरक्षीतस्थळी हलवण्यात येणार आहे, त्यानंतर त्यांना भारतात आणलं जाणार आहे. उद्या इराणमध्ये अडकलेले 110 भारतीय विद्यार्थी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत.

इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांनी इराणमधील भारतीय दूतावासाच्या संर्पकात राहवं असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे, त्यासाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.

तेहरानमधील भारतीय दूतावासाचे आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक:

फक्त कॉलसाठी: +98 9128109115, +98 9128109109

व्हाट्सअ‍ॅपसाठी: +98 901044557, +98 9015993320, +91 8086871709

ईमेल- cons.tehran@mea.gov.in

नवी दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाचे हेल्पलाइन क्रमांक

800118797 (टोल फ्री), +91-11-23012113, +91-11-23014104, +91-11-23017905

ईमेल- situationroom@mea.gov.in