गुजरातच्या राजकारणात धक्कातंत्र, गुजरात काँग्रेसमधून आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तीचा राजीनामा

| Updated on: Sep 05, 2022 | 3:26 PM

या वर्षी जानेवारी महिन्यातच विश्वनाथ सिंह वाघेला यांची गुजरात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी राष्ट्रीय पातळीवर मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भारत जोडो अभियानाला काँग्रेसच्या नेत्यांमुळे गालबोट लागत असल्याचे बोलले जात आहे.

गुजरातच्या राजकारणात धक्कातंत्र,  गुजरात काँग्रेसमधून आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तीचा राजीनामा
Follow us on

अहमदाबादः देशातील राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आला आहे. महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडमध्ये सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडी घडत असतानाच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या गुजरात दौऱ्यापूर्वीच एक दिवस आधी रविवारी गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ वाघेला (Youth Congress president Vishwanath Vaghela) आणि गुजरात काँग्रेसचे सरचिटणीस विनय सिंह तोमर (Congress General Secretary Vinay Singh Tomar) यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. नेत्यांच्या या राजीनामा नाट्यामुळे गुजरातमधील काँग्रेस संघटना सातत्याने कमकुवत होत असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या राजकीय भवितव्यासाठी ही चिन्हे चांगली नसल्याचेही सांगितले जात आहे. या घटना घडामोडी चालू असतानाच आज सोमवारी राहुल गांधी यांच्या दौऱ्यादरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून राजीनामे दिले जात असल्याने गुजरात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेपूर्वीच राहुल गांधी गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

परिवर्तन संकल्प संमेलन

अहमदाबादमधील साबरमतीतील कार्यकर्त्यांच्या परिवर्तन संकल्प संमेलनात त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. मात्र यावेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसची अवस्थी बिकट झाली आहे.

काँग्रेस छोडो अभियान सुरू

राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच रविवारी गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ सिंह वाघेला यांनी राजीनामा दिला होता. तर आजच्या दौऱ्यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस विनय सिंह यांनीही राजीनामा देऊन पक्षाला अडचणीत टाकले आहे. यावर प्रतिक्रिया देताना गुजरात भाजपचे प्रवक्ते रुतविज पटेल यांनी सांगितले की, राहुल गांधी काँग्रेसमधील लोकांना जोडण्यासाठी मोहीम चालवत असले तरी काँग्रेसमधील नेते मात्र काँग्रेस छोडो अभियान सुरू करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

भारत जोडो अभियानाला गालबोट

या वर्षी जानेवारी महिन्यातच विश्वनाथ सिंह वाघेला यांची गुजरात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी राष्ट्रीय पातळीवर मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भारत जोडो अभियानाला काँग्रेसच्या नेत्यांमुळे गालबोट लागत असल्याचे बोलले जात आहे.