मृत्यूचं तांडव घडूनही पुन्हा उभं राहतं हे शहर, पूल दुर्घटनेनंतर चर्चेत आलेल्या मोरबीचा इतिहास काय?

असंख्य मृत्यू, नैसर्गिक आपत्ती, दुर्दैवी अपघात या शहरानं पचवलेत, पण पुन्हा पुन्हा बळ एकवटून ते उभंही राहतं...

मृत्यूचं तांडव घडूनही पुन्हा उभं राहतं हे शहर, पूल दुर्घटनेनंतर चर्चेत आलेल्या मोरबीचा इतिहास काय?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 31, 2022 | 2:37 PM

अहमदाबादः गुजरातमध्ये (Gujrat) रविवारी संध्याकाळी मोरबी (Morbi) शहरातील पूल कोसळल्याने (Morbi Bridge Collapse) मोठी दुर्घटना घडली. यात जवळपास 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. अजूनही बचाव कार्य सुरु आहे. पण अचानक एवढे मृत्यू ओढवल्याने गुजरातमधील मोरबी हे शहर अचानक बातम्या आणि चर्चांच्या केंद्रस्थानी आलंय.

या निमित्ताने मोरबी शहराचा इतिहासही धुंडाळला जातोय. जुन्या घटना आणि वर्णनांमध्ये डोकावून पाहिलं असता, मृत्यूचं हे तांडव मोरबी शहरानं या आधीही पाहिलं अन् पचवलंही असंच दिसून येतेय. सिरॅमिक आणि क्लॉक इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराचा इतिहास तेवढाच चढ-उतारांचा आहे.

1879 ते 1948 दरम्यान हे शहर वसवण्यात आलं, असं मानलं जातं. त्यावेळी राजा वाघ याने नेहमीच प्रजेला केंद्रस्थानी ठेवून शहराची निर्मिती केली. रस्ते, रेल्वेमार्ग निर्मिती करताना आधुनिक विकासाची कास धरली.

कपडे आणि मीठाची निर्यात करण्यासाठी येथे नवलखा आणि ववानिया या दोन बंदरांची निर्मितीही करण्यात आली. मोरबीचं रेल्वे स्टेशन स्थापत्य शैलीचं अनोखं उदाहरण आहे. युरोपीय स्थापत्य कलेचा प्रभावही येथे दिसून येतोय

सिरॅमिक आणि क्लॉक इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर नदी किनारी वसलेलं आहे. त्यामुळे आजू-बाजूच्या शहरांसाठी मोरबी नेहमीच आकर्षण केंद्र ठरलंय. याच शहराच्या मध्यभागी आहे हँगिंग ब्रीज अर्थात झुलता पूल.

मोरही हे शहर लंडनच्या धर्तीवर वसवण्यात आलं होतं. मोरबीचा झुलता पूल लंडनमधील रिव्हरफ्रंटची आठवण करून देतो. राजकोटपासून जवळपास 60 किमी अंतरावर मोरबी आहे. पण इथल्या इमारती  19 व्या शतकातील युरोपची आठवण करून देतात. नदी किनारी झालेल्या आधुनिक पद्धतीच्या विकासामुळेही हे जास्त प्रसिद्ध आहे.

मच्छु नदी किनाऱ्यावरील जो झुलता पूल कोसळला. तिथे यापूर्वी एकदा पूरानं थैमान माजवलं होतं. 11 ऑगस्ट 1979 रोजी अतिवृष्टीमुळे पूर आला. मच्छू धरण फुटलं. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील संपूर्ण शहर पुरात ओढलं गेलं. अनेक घरं पडली. या भयंकर घटनेत तब्बल 1439 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 12 हाजारांपेक्षा जास्त प्राण्यांचा मृ्त्यू झाला होता.

असं भयंकर मृत्यूचं तांडव पचवल्यानंतर मोरबी पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर चालत उभं राहिलं. सिरॅमिक आणि क्लॉक इंडस्ट्रीसाठी लोकप्रिय झालं. अजंता क्वार्ट्जसारख्या कंपन्यांनी इथे बस्तान बसवलं. टाइल्स व्यापारही फोफावला. एका अहवालानुसार मोरबीत 390 सिरॅमिक आणि 150 भिंतीवरील घड्याळ्याच्या कंपन्या आहेत.