मुलांच्या लग्नापूर्वी पळून गेलेले विहीण-व्याही परतले
गुजरातच्या सुरत शहरात काही दिवसांपूर्वी प्रेमाचं एक अनोखं प्रकरण समोर आलं होतं. इथे मुलांच्या लग्नापूर्वी मुलाचे वडील आणि मुलीची आई पळून गेले होते.
गांधीनगर : गुजरातच्या सुरत शहरात काही दिवसांपूर्वी प्रेमाचं एक अनोखं प्रकरण समोर आलं होतं. इथे मुलांच्या लग्नापूर्वी मुलाचे वडील आणि मुलीची आई पळून गेले होते. आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे (to be in laws elope). मुलांच्या लग्नापूर्वी अचानक गायब झालेलं हे विहिण-व्याही अखेर परतले आहेत. त्यांनी पोलिसांसमोर हाजरीही लावली. मात्र, महिलेच्या पतीने तिला स्वीकारण्यास नकार दिला आहे. पतीने नकार दिल्यानंतर महिलेचे वडील तिला घ्यायला पोलीस ठाण्यात पोहोचले (Surat In Laws Story).
फेब्रुवारीमध्ये मुलांचं लग्न, जानेवारीत विहिण-व्याही पळाले
सुरत येथील 48 वर्षीय राकेश (बदललेलं नाव) यांच्या मुलाचं लग्न 46 वर्षीय आरती (बदललेलं नाव) यांच्या मुलीशी होणार होतं. येत्या फेब्रुवारी महिन्यात हा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, आपल्या मुलांच्या लग्नापूर्वीच राकेश आणि आरती पळून गेले.
तेव्हा लग्न करु शकले नाही
हे दोघे अनेक काळापासून एकमेकांना ओळखायचे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, नंतर आरती यांचं लग्न नवसारी येथील हीरा कारागिराशी झालं. बऱ्यााच कालावधीनंतर राकेश आणि आरती हे एकमेकांना भेटले ते विहिण आणि व्याही म्हणून. राकेश यांचा मुलगा आणि आरती यांच्या मुलीचं लग्न जुळलं. लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. मात्र, या दरम्यान राकेश आणि आरतीला त्यांचं जूनं प्रेम आठवलं आणि ते कुणाचीही पर्वा न करता पळून गेले होते.