नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने (heavy rain) धुमाकूळ घातला आहे. सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंजाब (Punjab) आणि हिमाचल प्रदेशला जोडणारा रेल्वेचा चक्की पूल वाहून गेला आहे. पावसाच्या जोरामुळे हा पूल चक्की नदीत पत्त्याप्रमाणे कोसळला. मात्र या मार्गावरून रेल्वे वाहतूक आधीपासूनच बंद करण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित बनल्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.धुव्वाधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकणी भूस्खलनाच्या घटना देखील घडल्या आहेत. राज्यात पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भूस्खनामुळे धर्मशाळा ते कांगडा हा मार्ग तब्बल तीन तास बंद होता. मंडी जिल्ह्यात अति पावसामुळे डोंगर कोसळल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग धोकादायक बनले आहेत. हिमाचल प्रदेशच्या चंबा -पठानकोट महामार्गावर पावसामुळे रस्ता खचल्याने बसचा अपघात होता-होता राहिला आहे. बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.पावसामुळे अनेक राष्ट्रीय तसेच राज्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे राज्यात पूरस्थिती देखील गंभीर बनली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
Himachal Pradesh | National Highway 5 closed at Kandaghat in Solan district due to landslide pic.twitter.com/zEkVZzXpuF
— ANI (@ANI) August 20, 2022
दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळात रुपांतर झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागात मूसळधार ते मध्यमस्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा पाऊस झाल्यास याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.