TVK Vijay : 2021 चा तो गेम चेंजर निर्णय, तिथेच विजयला कळलं की तामिळनाडूच्या राजकारणाचा तो बॉस बनू शकतो
TVK Vijay : थलपती विजयने तामिळनाडूच्या राजकारणात मोठा चमत्कार केला आहे. सगळ्या देशात विजयच्या या राजकीय यशाची चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी आलेला हा पक्ष इतक्या कमीवेळात तामिळ राजकारणात सत्तेपर्यंत कसा पोहोचला? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. विजयने ही कमाल एकारात्रीत केलेली नाही. त्यामागची रचना काय होती? किती वर्ष मेहनत केली? त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात दोन राज्यांचे निकाल खूप वैशिष्ट्य पूर्ण ठरले. देशात त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. एक म्हणजे पश्चिम बंगाल आणि दुसरं तामिळनाडू. पश्चिम बंगालमध्ये भाजपने पहिल्यांदा पूर्ण बहुमत मिळवलं आहे. काँग्रेस, डावे, तृणमुल काँग्रेस यांनी स्वातंत्र्यापासून पश्चिम बंगालवर राज्य केलं. हे तीन पक्ष आणि भाजपं यांच्यातला मुख्य फरक म्हणजे विचारधारा. या तिन्ही पक्षाच्या विचारात एक समानता आहे ती म्हणजे विचारधारा. भाजपने नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला कौल देणं म्हणजे एकप्रकारे हिंदुत्वाच्या विचारधारेवर शिक्कामोर्तब करण्यासारख आहे. त्याशिवाय पश्चिम बंगालला राजकीय हिंसाचाराची एक परंपरा आहे. डाव्यांकडून बंगाल जिंकताना ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसला आणि आता त्यांच्याकडून बंगालमध्ये सरकार आणताना भाजपला प्रचंड मोठ्या राजकीय हिंसाचाराचा सामना करावा लागला. कार्यकर्त्यांना अनेक जीवघेणे हल्ले सोसावे लागले. त्यामुळे पश्चिम बंगालमधला भाजपचा विजय ऐतिहासिक आहे.
दुसरीकडे तामिळनाडूत 50 पेक्षा जास्त वर्षानंतर एक मोठं राजकीय परिवर्तन पहायला मिळालय. तामिळनाडूत मागची गेली अनेक वर्ष द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोनच पक्षांमध्ये सत्तेचा खेळ चालू होता. दर पाचवर्षांनी आलटून-पालटून या दोन पक्षांची सत्ता यायची. करुणानिधी आणि जयललिता हे तामिळ राजकारणाचे दोन मुख्य चेहरे होते. आता त्यांच्या पश्चात ‘तमिलगा वेत्री कळघम’ टीव्हीके या नव्या पक्षाची तामिळनाडूच्या राजकारणात जोरदार एन्ट्री झाली आहे. तामिळनाडूच्या राजकारणावर कलाकारांचा पूर्वीपासून पगडा आहे. एमजी रामचंद्रन यांच्यापासून ही पंरपरा सुरु झाली. रामचंद्रन आणि जयललिता यांनी चित्रपटाचा रुपेरी पडदा गाजवला. त्यानंतर राजकारणात एन्ट्री केली. हे कलाकार पडद्यावर काम करताना तामिळनाडूची जनता त्यांच्यावर मनापासून प्रेम करायची. तामिळ इंडस्ट्रीतील हे दोन्ही मोठे स्टार राजकारणात आल्यानंतर त्यांची तीच लोकप्रियता टिकून राहिली. सर्वसामान्य लोक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायचे.
तामिळनाडूत कुठल्या पक्षाला किती जागा?
रामचंद्रन, जयललिता यांची परंपरा आता थलपती विजय पुढे चालवणार आहे. कारण कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात तामिळ जनतेनेच तसा कौल दिला आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वा स्थापन झालेल्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ टीव्हीके पक्षाला जनतेने सत्तेत नेऊन बसवलं आहे. 234 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. विजयच्या टीव्हीके पक्षाला 107 जागा मिळाल्या आहेत. द्रमुकला 60 आणि अण्णाद्रमुकला 47 जागा मिळाल्या. बहुमतासाठी विजयच्या पक्षाला अजून 11 जागांची आवश्यकता आहे. अन्य पक्षाच्या साथीने बहुमताचा हा आकडा विजयचा पक्ष नक्कीच गाठेल. कारण तामिळ जनतेने सत्तेचा स्पष्ट कौलच त्यांना दिला आहे.
भले, भले राजकीय पंडित हैराण
तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजयचा पक्ष असा काही चमत्कार घडवेल अशी कोणीही अपेक्षा केली नव्हती. बहुतांश एक्झिट पोल्सनी द्रमुक सत्तेत येणार असा अंदाज वर्तवलेला. त्यामुळे कोणाच्या ध्यानी मनी नसताना मतमोजणीच्या दिवशी अचानक विजयच्या पक्षाने तामिळ राजकारणात मोठी मुसंडी मारली आणि भल्या भल्या राजकीय पंडितांना हैराण करुन सोडलं. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या प्रस्थापित पक्षांना धक्का देणं सोपं नव्हतं. पण विजयने ही किमया कशी साधली? ते जाणून घ्या.
थलपती विजयच्या भूमिकांचा आणि राजकारणाचा काय संबंध?
थलपती विजय आधी बाल कलाकार म्हणून पडद्यावर झळकला. लहानपणापासून त्याने चित्रपट सृष्टी जवळून पाहिली आहे. त्याचे वडिल दिग्दर्शक तर आई गायिका आहे. चित्रपटाच्या पडद्यावर भूमिका साकारताना थलपती विजयने जनतेच्या मनातील तो नायक ठरेल अशाच भूमिका स्वीकारल्या. प्रस्थापित सत्तेविरोधात लढणार, अन्याय, भ्रष्टाचाराविरोधात लढणारा, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा नायक त्याने रंगवला. आज राजकारणात त्याला याच इमेजचा मोठा फायदा झाला. चित्रपटातून त्याने जे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवलं. तो राजकारणात आल्यानंतर त्याच्या त्याच इमेजवर विश्वास ठेऊन जनतेने त्याला मतपेटीतून साथ दिली.

Vijay
TVK पक्ष स्थापन होण्याआधी काय केलं?
विजय चित्रपट सृष्टीत काम करताना त्याचा संपूर्ण तामिळनाडूत एक फॅन क्लब तयार झाला. ‘तमिलगा वेत्री कळघम’ TVK पक्षाची स्थापना केल्यानंतर याचं फॅन क्लबमुळे पक्ष विस्तार होऊ शकला. चित्रपटांच्या प्रमोशन पलीकडे जाऊन विजयच्या या फॅन क्लबने समाज कल्याणाची कामं केली. रक्तदान शिबिरं, मदत कार्य, विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळे असे समाजपयोगी कार्य विजयने फॅन क्लबच्या माध्यमातून केलं. कोईमबतोर सारख्या शहरात विजयचा हजारोंच्या संख्येत फॅन क्लब तयार झाला. संघटितपणे हा चाहता वर्ग काम करत होता. वेळेबरोबर या फॅन क्लबचं लोकांबरोबर थेट आणि अराजकीय नातं तयार झालं. फक्त निवडणुकीच्यावेळी पहिल्यांदा TVK पक्षाने लोकांशी संपर्क साधला नाही. राजकीय पक्ष बनण्याआधी फॅन क्लब म्हणून ते कार्यरत होते.
राजकीय प्रवेशाआधी हे महत्वपूर्ण यश
अधिकृत राजकारणात प्रवेश करण्याआधी 2021 साली विजयने प्रेक्षकांच्या प्रेमातून तयार झालेल्या या अराजकीय संघटनेची चाचणी घेतली. फॅन क्लबशी संबंधित सदस्यांनी अपक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या. कुठलाही पक्ष किंवा पूर्णवेळ प्रचार नव्हता. फक्त नेटवर्क सक्रीय होतं. विजय फॅन क्लबच्या 169 पैकी 115 उमेदवारांनी विजय मिळवला. राजकीय प्रवेशाआधी हे महत्वपूर्ण यश होतं. फॅन नेटवर्कच्या माध्यमातून उमेदवाराची निवड, बूथ व्यवस्थापन आणि मतदारांना एकत्र आणणं हाताळता येईल हे लक्षात आलं. पक्ष चिन्हाशिवाय मतदारांकडून सपोर्ट मिळतो हे महत्वाचं होतं.

TVK Boss
भावनिकता जपली पण संघटनात्मक शिस्त आणली
2026 तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजयसाठी व्यक्तीची योग्य निवड जास्त महत्वाची होती. TVK ने कॉर्पोरेट पद्धतीने काम केलं. मुलाखती, पार्श्वभूमी तपासणी ही कामं केली. उत्साही चाहता असणं हा कुठलीही जबाबदारी देण्यासाठी एकमेव निकष नव्हता. त्यासाठी त्या कार्यकर्त्याला या सर्व वेगवेगळ्या निवडीच्या फेऱ्यांमधून जावं लागलं. वॉर्ड प्रभारी, बूथ एजंट, मतदारसंघ समन्वयक यांची एका प्रक्रियेतून निवड झाली. विजयच्या फॅन क्लबने भावनिकता जपून ठेवली. पण संघटनात्मक शिस्त आणली.
हे येणारा काळच ठरवेल
अनेक वर्षांपासून असलेले विजय फॅन क्लबचे व्हॉट्स अप ग्रुप प्रचाराचा मुख्य भाग ठरले. विजय बंद दाराआड स्थानिक नेत्यांसोबत बैठका घेऊन त्यांची मतं, पक्षाला मिळणारा प्रतिसाद जाणून घेत होता. पक्षाने भ्रष्टाचाराला विरोध आणि जन कल्याण हे मुद्दे लावून धरले. फॅन क्लबमधून विचारपूर्वक आकाराला आणलेल्या या पक्षाने मग एकदिवस तामिळ राजकारणात मोठी कमाल केली. हे एकारात्रीत मिळालेलं यश नाही. त्यामागे सुसूत्रबद्ध विचार आहे. जे कमल हसन, रजनीकांत या तामिळ सुपरस्टार्सना जमलं नाही, ते थलपती विजयने करुन दाखवलं आहे. एमजी रामचंद्रन आणि जयललिता यांच्यासारखं विजयला पुढची अनेक वर्ष पाय रोवून उभं राहता येईल का? हे येणारा काळच ठरवेल.
