Agni-5 MIRV : पाकिस्तान-चीन आपल्या शेजारीच, मग त्यासाठी 5 हजार किमी रेंज असलेल्या मिसाइलची गरज काय?

Agni-5 MIRV : चीन-पाकिस्तान आपल्या शेजारीच आहेत, मग त्यासाठी आपल्याला 5000, 10000 किलोमीटर रेंज असलेली मिसाइल बनवण्याची गरज काय? असा प्रश्न काही जणांच्या मनात येऊ शकतो. पण अशी मिसाइल बनवणं का गरजेचं आहे? त्यामागे उद्देश काय? तो समजून घ्या.

Agni-5 MIRV : पाकिस्तान-चीन आपल्या शेजारीच, मग त्यासाठी 5 हजार किमी रेंज असलेल्या मिसाइलची गरज काय?
Agni-5 MIRV
Image Credit source: PTI
| Updated on: May 12, 2026 | 6:42 PM

या लेखाचं हेडींग वाचून कधी तुमच्या मनात असा प्रश्न येत नाही का, चीन-पाकिस्तान आपल्या शेजारीच आहेत, मग त्यासाठी आपल्याला 5000, 10000 किलोमीटर रेंज असलेली मिसाइल बनवण्याची गरज काय? भारताकडे आज ब्राह्मोस, प्रलय, अग्नि अशी अनेक मिसाइल्स आहेत, जी काही मिनिटात चीन-पाकिस्तानमधील लक्ष्याचा वेध घेऊ शकतात. मग, इतक्या लांब पल्ल्याची, हजोर किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करु शकणाऱ्या क्षेपणास्त्रांची गरज काय?. आपले दोन्ही मुख्य शत्रू आपल्या शेजारीच राहतात. तुम्हाला जरी असा प्रश्न पडत असला तरी अशी मिसाइल का बनवली जातात? त्यामागे काय कारणं आहेत? त्याची गरज का आहे? ते आपण समजून घेऊया. भारताने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरु केला, तो मूळात चीन-पाकिस्तान पासून असलेला धोका लक्षात घेऊन. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका ही नेहमी शांतताप्रिय देशाची राहिली आहे.

स्वातंत्र्यापासूनच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारताने स्वत:हून कधीच कुठल्या देशावर हल्ला केलेला नाही. उलट समोरच्या शत्रूने जेव्हा विनाकारण युद्ध पुकारलं, आगळीक केली, तेव्हा भारताने उत्तर दिलय. 1962 पासूनच हाच इतिहास आहे. आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम असो वा अणवस्त्र कार्यक्रम. त्याचा उद्देश शत्रूवर धाक निर्माण करणं हा आहे. ही सर्व शस्त्र शत्रूवर हल्ला करण्यासाठी नाही, तर शत्रुने हल्ल्याचा विचारही करु नये, यासाठी बनवलेली आहेत. आता अग्नि क्षेपणास्त्र कार्यक्रमावर येऊया. भारताकडे अग्नि सीरीजमधील अनेक वेगवेगळ्या रेंजची क्षेपणास्त्र आहेत. चीन-पाकिस्तानच्या अनेक शहरांना काही मिनिटात भारत सहज टार्गेट करु शकतो.

MIRV टेक्नोलॉजीचं वैशिष्ट्य काय?

भारताने नुकतीच 8 मे रोजी ओदिशाच्या डॉ.एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी केली. आपल्याकडे अग्नि-5 क्षेपणास्त्र फार आधीपासून आहे. या मिसाइलची रेंज 5000 किलेमीटरपेक्षा अधिक आहे. यावेळच्या अग्नि 5 क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे Multiple Independently Targeted Re-Entry Vehicle (MIRV) टेक्नोलॉजी. जगातील निवडक देशांकडे MIRV टेक्नोलॉजी आहे. एमआयआरव्हीचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच मिसाइलमधून अनेक टार्गेट्स भेदता येतात.

प्रत्येक टप्प्यावर बारीक लक्ष

DRDO ने MIRV टेक्नोलॉजी असलेलं अग्नि मिसाइल डॉ.एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन डागलं. चाचणीवेळी हे मिसाइल अनेक पेलोड्ससह लॉन्च करण्यात आलं. हिंद महासागर क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणांवरील निर्धारित लक्ष्य या क्षेपणास्त्राने यशस्वीरित्या भेदली. मिसाइलच्या उड्डाणावर लक्ष ठेवण्यासाठी जमीन आणि समुद्रातील ट्रॅकिंग सिस्टिमचा वापर करण्यात आला. लॉन्च केल्यापासून पेलोड्सकडून लक्ष्य भेद होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर बारीक लक्ष ठेवण्यात आलं.

संरक्षण मंत्रालयाने काय म्हटलं?

अग्नि-5 च्या यशस्वी चाचणीने दाखवून दिलय की, एकाच मिसाइल सिस्टिमद्वारे वेगवेगळ्या रणनितीक टार्गेट्सवर हल्ला करता येतो असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. DRDO प्रयोगशाळेने विविध कंपन्यांच्या सहकार्याने विकसित केलं आहे. परीक्षण चाचणीवेळी DRDO चे वरिष्ठ वैज्ञानिक आणि भारतीय सैन्याचे अधिकारी उपस्थित होते.

अनेक अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम

अग्नि-5 मिसाइलची रेंज 5000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. यात तीन टप्प्यांचं सॉलिड फ्यूल इंजिन वापरण्यात आलं आहे. MIRV टेक्नोलॉजी असलेली मिसाइल्स सामान्य मिसाइल्सपेक्षा जास्त शक्तीशाली मानली जातात. कारण त्यांच्यात एकाचवेळी अनेक न्यूक्लियर वॉरहेड घेऊन जाण्याची क्षमता असते. त्याशिवाय DRDO ने अग्नि मिसाइल्सची दुसरी वर्जन सुद्धा बनवली आहेत. अग्नि-1 ची रेंज 700 किलोमीटर, अग्नि-2 ची रेंज 2,000 किलोमीटर, अग्नि-3 ची रेंज 3,000 किलोमीटर आणि अग्नि-4 ची रेंज 4,000 किलोमीटर पर्यंत आहे. अग्नि-5 च्या MIRV सिस्टिममध्ये पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

मग, 5 हजार, 10 हजार किलोमीटरची मिसाइल बनवण्याची गरज काय?

आता प्रश्न हा येतो की, चीन-पाकिस्तान इतक्या जवळ असताना आपल्याला 5 हजार, 10 हजार किलोमीटर रेंजच्या क्षेपणास्त्रांची गरज काय?. याचं उत्तर रेंज नाहीय. पहिला हल्ला केल्यानंतर भारत त्याच वेगात दुसऱ्या लक्ष्याला भेदू शकतो. महत्वाचं म्हणजे हे सर्व फक्त एकाच मिसाइलमधून करणं शक्य आहे. त्याशिवाय वेगाने बदलणाऱ्या मिसाइल टेक्नोलॉजीमध्ये आपलं स्वत:च प्रभुत्व आहे. आपणही अशी मिसाइल्स बनवण्यास सक्षम आहोत हा संदेश या निमित्ताने जातो.

पाकिस्तानचं यात नुकसान काय?

अग्नि मिसाइलपेक्षा यातील MIRV टेक्नोलॉजी खास आहे. यामुळे पाकिस्तानची झोप उडणं स्वाभाविक आहे. कारण भारत एकाचवेळी स्पीडमध्ये 10 ते 12 टार्गेट उडवू शकतो. वेगवेगळ्या लक्ष्य भेदासाठी प्रत्येकवेळी नवीन मिसाइलची गरज पडणार नाही.

यामध्ये पाकिस्तानचं नुकसान हे आहे की, भारताने जी टेक्नोलॉजी विकसित केलीय, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला अजून खर्च करावा लागेल. याचा खर्च पाकिस्तान सारख्या कंगाल देशाला परवडवणार नाही. त्यांनी असं काही करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव आणखी वाढेल. भारतासारख्या देशासोबत शस्त्रास्त्रांची स्पर्धा पाकिस्तानला परवडणारी नाही.

DRDO अग्नि-6 साठी सुद्धा तयार

अमेरिका, रशिया, चीन आणि फ्रान्स या देशांकडेच अशी आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइल प्रणाली आहे. आता या देशांच्या पंक्तीत स्थान मिळवणारा भारत पाचवा देश ठरला आहे. पाकिस्तानकडे अशी टेक्नोलॉजी नाहीय. अग्नि -5 चा हायपरसोनिक स्पीड चीन-पाकिस्तानसाठी मोठा धोका आहे. अग्नि-5 ची 5000 किलोमीटरची रेंज 8000 किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकते. DRDO अग्नि-6 साठी सुद्धा तयार आहे. फक्त सरकाच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे.

 

Follow Us