दिल्लीत कशाचेही डुप्लिकेट मिळतील, अगदी माझाही डुप्लिकेट बनवतील, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

दिल्ली आणि महाराष्ट्र यातील मानसिक अंतर मोठे आहे. मी दिल्ली- मुंबई महामार्ग बांधला आहे. पण मला माहिती आहे तरीही मराठी माणसे दिल्लीला फार येणार नाही असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात वक्तव्य केले आहे.

दिल्लीत कशाचेही डुप्लिकेट मिळतील, अगदी माझाही डुप्लिकेट बनवतील, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
nitin gadkari
| Updated on: Apr 22, 2026 | 10:04 AM

नवी दिल्ली – दिल्लीत यायला मराठी माणूस नाखूश असतो. मला जेव्हा भाजपाचा अध्यक्ष म्हणून दिल्लीत जायला सांगितले तेव्हा माझ्या कपाळावर आट्या आल्या होत्या. दिल्ली म्हणजे आलू- पराठा आणि पनीरच खावे लागणार असे मला वाटले. मी दिल्ली ते मुंबई महामार्ग बांधला,पण मला माहिती आहे मराठी लोक फारसे दिल्लीत येणार नाहीत. कारण दिल्लीत आणि महाराष्ट्रात मानसिक अंतर मोठे आहे. दिल्लीत कशाचेही डुप्लिकेट मिळते. डुप्लिकेट नितीन गडकरीही मिळतील असे मिश्कील टिप्पणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. भारताच्या सह महालेखा नियंत्रक सुप्रिया देवस्थळी यांच्या ‘दिल्ली डायरी’ या पुस्तकाचे आज नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले, यावेळी ते बोलत होते.

जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या भाषेचे आणि संस्कृतीचे महत्व आपल्याला कळत नाही. तसेच तुम्ही भारताबाहेर जात नाही तोपर्यंत भारतीय संस्कृतीचे महत्व आपल्याला कळत नाही. मराठी भाषेचे संस्कृती मोठी आहे. मराठी आणि बंगाली भाषेचे साहित्य आणि संस्कृती मोठी आहे. मराठी लोकांची स्वत:ची अशी ओळख आहे. परंतू मराठी माणसे बाहेर जाण्यास नाखूष असतात. असे व्हायला नको. आपण येथे येऊन आपली भाषा आणि संस्कृती पसरवली पाहिजे. माझ्या खात्याही मराठी माणसे नाहीत. आता अमेरिकेत मराठी माणस सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आहेत. परंतू दिल्लीत नाहीत अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

आपल्या माणसाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यांना डायरी लिहायची सवय नाही.लंडनमध्ये तुम्ही गेल्यात प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीचे साहित्य, त्याच्या डायरी असतात. आपण अशी इतिहासाची नोंद केलेली नाही असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले. आता सुप्रिया देवस्थळी यांच्या ‘दिल्ली डायरी’ या पुस्तकामुळे दिल्लीत नव्याने येणाऱ्या मार्गदर्शन मिळेल. दिल्लीत कसे राहावे याची माहिती मिळेल असेही गडकरी यावेळी म्हणाले.

येथे पोस्ट पाहा –

राजकारणात दिल्ली शिवाय पर्याय नाही

आपण जेव्हा चाबाहार बंदराच्या कामासाठी इराणला गेलो तेव्हा अयातुल्ला खामेनेई यांची भेट व्हायची असे नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते म्हणाले की खामेनेई यांनी मला विचारले होते की पर्शियन भाषेचे मुळ कुठे माहिती आहे का ? त्यानंतर ते म्हणाले होते की आमची पर्शियन भाषा संस्कृतमधून आलेली आणि आमचे मूळ लखनऊ जवळ आहे. विविध एकता अशी आपली संस्कृती आहे. तुम्हाला दिल्ली आवडू या न आवडो राजकारणात दिल्ली शिवाय पर्याय नाही. दिल्ली हे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे केंद्र आणि भारत सरकारचे केंद्र आहे. परंतू इथे मराठी टक्का वाढला पाहीजे अशीही अपेक्षा नितीन गडकरी यांनी यावेळी केली.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us