EXPLAINED : भारतात नीटचा पेपर फुटला, शेजारच्या चीनमध्ये परीक्षा कशा होतात, तिथे असे पेपर का फुटत नाहीत?
भारतात नीट सारख्या महत्वाच्या परीक्षेचा पेपर फुटला. शेजारच्या चीनमध्ये सुद्धा असे प्रकार होतात का? तिथे महत्वाच्या स्पर्धा परीक्षांचं कसं नियोजन केलं जाते. सरकारकडून तिथे काय पावलं उचलली जातात हे समजून घ्या.

भारतात सध्या नीट परीक्षा पेपर फुटीवरुन मोठा गदारोळ सुरु आहे. रस्त्यावरुन आंदोलनाच्या रुपाने सुरु झालेली ही लढाई आता देशाच्या संसदेपर्यंत पोहोचली आहे. या सगळ्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घेतला. त्यासाठीच विद्यार्थ्यांचं मागच्या महिन्याभरापासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन सुरु होतं. काल लोकसभेत वादळी चर्चेनंतर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटीचे असे प्रकार रोखण्यासाठी नंदन नीलकेणी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. देशात नीट पेपर फुटीची घटना पहिल्यांदा घडलेली नाही. याआधी सुद्धा अन्य महत्वांच्या परीक्षांचे पेपर फुटले आहेत.
पेपर फुटल्यानंतर होणारा मनास्ताप, मनाला होणाऱ्या वेदना शब्दात मांडता येणार नाहीत. कारण विद्यार्थी महत्वाच्या स्पर्धा परीक्षांची वर्षभरापासून तयारी करत असतात, त्यात विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालकही सहभागी असतात. संपूर्ण कुटुंब त्या परीक्षेच्या प्रक्रियेत गुंतलेलं असतं. त्यामुळे पेपर फुटीमुळे होणारा त्रास खूप वेदनादायी असतो. यंदा नीटचा पेपर फुटल्यामुळे 27 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. मधल्या 46 दिवसात पुन्हा फेरपरीक्षा झाली. जवळपास 13 विद्यार्थ्यांनी या त्रासामुळे आपलं जीवन संपवण्यासारखं टोकाचा निर्णय घेतला. मुलांनी आपलं जीवन संपवलं त्याची जबाबदारी कोणाची, हाच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. म्हणूनच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. मोदी सरकारला बॅकफूटवर जावं लागलं.
चीनमध्ये का पेपर फुटत नाहीत?
भारतात नीट सारख्या महत्वाच्या परीक्षांचे पेपर फुटतात. शेजारच्या चीनमध्ये सुद्धा असचं होतं का? तिथे कशी परीक्षा पद्धती आहे?. हे समजून घेऊया. नीट परीक्षेसारखीच चीनच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून एक प्रश्नपत्रिका सेट केली जाते. विविध प्रांतांमधील सरकारं त्यावर अंमलबजावणी करतात. चीनमध्ये पेपर फुटू नयेत यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन केलं जातं. स्टेट सिक्रेट म्हणजे प्रश्नपत्रिका गोपनीय कागदपत्रांसारखी संभाळली जाते. प्रश्नपत्रिका ज्या गाड्यांमधून जातात, त्यांनी जीपीएसने ट्रॅक केलं जातं. पोलीस बंदोबस्त असतो. परीक्षेचे पेपर बनवणाऱ्या शिक्षकांना सुरक्षित ठिकाणी महिन्याभरासाठी एकांतवासात ठेवलं जातं.
पेपर छपाई नंतर जो कचरा असतो तो..
उच्च सुरक्षा असलेल्या युनिट्समध्ये पेपर छापले जातात. पेपर छपाई नंतर जो कचरा असतो, त्याची विल्हेवाट लावताना सुद्धा विशेष दक्षता घेतली जाते, जेणेकरुन पेपर फुटू नये. ज्या परीक्षा केंद्रांमध्ये पेपर होतात, तिथे चेहरा ओळखण्याची सिस्टिम असते, जेणेकरुन डमी उमेदवार पेपरला बसू नये. मोबाइल किंवा अन्य माध्यमातून परीक्षार्थीशी संपर्क होऊ नये यासाठी सिग्नल जॅमर्स असतात. पेपर फुटू नये तसचं परीक्षेत कॉपी होऊ नये यासाठी टेक्नोलॉजीचा उच्च पातळीवर वापर केला जातो. परीक्षार्थींना वेळेवर पोहोचता यावं यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल केले जातात. या उलट भारतात पेपर लीक आणि टेक्नोलॉजीचा वापर करुन कॉपी असे दोन्ही प्रकार होतात.