
India – canada Raw : भारत आणि कॅनडा दरम्यान संबंध बिघडले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुड्रो याला जबाबदार आहेत. कोणताही पुरावा नसताना भारतावर आरोप करणे त्यांना चांगलंच भारी पडलं आहे. राजनैतिक वाद शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कॅनडाने भारतीय राजनयिकाची देशातून जाण्यास सांगितल्यानंतर भारताने ही त्यावर सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने आपल्या बाजुने कारवाईचा इशारा दिला. भारताने कॅनडाला असे धक्के दिले की त्याची अपेक्षाही नव्हती. भारत सरकारने कॅनडाला भारतातील आपल्या मुत्सद्दींची संख्या १०
ऑक्टोबरपर्यंत कमी करण्यास सांगितले. आता कॅनडानेही ही प्रक्रिया सुरू केल्याचे वृत्त समोर आले आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत सरकारने कॅनडाला मुत्सदी अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्यास सांगितल्यानंतर आता कॅनडाकडून तशी कार्यवाही सुरु झाली आहे. कॅनडात आमचे जेवढे राजनयिक आहेत तेवढेच राजनयिक नवी दिल्लीत असावेत, असे भारतीय प्रशासनाने म्हटले होते. अहवालानुसार, कॅनडानेही आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कॅनडा आपल्या मुत्सद्यांना भारताबाहेर क्वालालंपूर किंवा सिंगापूरला पाठवत असल्याची माहिती मिळाली आहे.
भारतात कॅनडाच्या राजदूतांची संख्या 60 च्या आसपास आहे. पण आता ही संख्या 36 पर्यंत कमी करावी असे भारत सरकारने म्हटले होते. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सर्व आरोपांना आधीच उत्तर दिले आहे. कॅनडाचे सर्व आरोप ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं भारताने म्हटलं होतं.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरणाऱ्या जस्टिन ट्रुड्रो यांना भारताने जशाच तसे उत्तर दिल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताने कडक भूमिका घेतल्यानंतर ट्रुडो यांनी नरमाईची भूमिका घेतली होती. पण भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. कॅनडाला भारतासोबतची परिस्थिती वाढवायची नाही. असे त्यांनी म्हटले होते.
भारतावर पुराव्याशिवाय आरोप करणं हे कॅनडाच्या पंतप्रधानांना चांगलंच अडचणीत आणू शकतं. कारण इतर देशांनी देखील याप्रकरणी जस्टिन ट्रुडो यांना झापले आहे. भारताने आपली भूमिका याआधीच सर्व देशांना कळवली आहे.