Siren Alert : हल्ला होण्यापूर्वी नेमका कधी वाजतो सायरन? स्वतःला जीव वाचण्यासाठी किती वेळ मिळतो?
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव चांगलाच शिगेला पोहोचला आहे. पहलगाम हल्ल्याचा भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेतला. भारताने मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या युद्धाच्या परिस्थितीत देशात नुकतंच मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट करण्यात आलं. यावेळी हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन देखील वाजवल्याचे पाहायला मिळाले.

सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ७ मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले होते. या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा याचं प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी काही सायरन देखील वाजवण्यात आले. सायरन वाजल्यावर किंवा ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती असेल त्यावेळी सायरन वाजल्यास काय करावे? याचे प्रशिक्षण देण्यात आले.
नुकत्याच झालेल्या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन देखील वाजवण्यात आला. हा सायरन वाजवण्याचा उद्देश म्हणजे नागरिकांना हवाई हल्ल्यासारख्या परिस्थितीत आपला जीव कसा वाचवायचा हे शिकवणं असा होता. मात्र तुम्हाला माहितीये का, मिसाईल अॅटक, एअर स्ट्राईक होण्यापूर्वी कधी वाजवला जातो सायरन? आणि स्वतःला जीव वाचण्यासाठी किती मिळतो वेळ? चला जाणून घ्या…
हल्ला होण्यापूर्वी कधी वाजतो सायरन?
समजा जेव्हा हवाई हल्ल्याचा धोका निर्माण होतो तेव्हा नागरिकांना सतर्क आणि सुरक्षिततेचा इशारा दिला जातो. यासाठी एक महत्त्वाची यंत्रणा सज्ज असते, ती म्हणजे एअर रेड सायरन. एअर रेड सायरनचा आवाज एका विशिष्ट प्रकारचा असतो. हा सायरन जेव्हा वाजवला जातो तेव्हा मिसाईल अॅटक, एअर स्ट्राईकचा धोका असतो. कधीकधी नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही हा सायरन वाजवला जातो. हल्ला होण्यापूर्वी साधारण हा सायरन ६० सेकंदापर्यंत वाजतो. या सायरनचा अर्थ असा की लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेण्याची गरज आहे. आजही विमानतळांवर आणि हवाई दलात हवाई हल्ल्याचे सायरन वाजत असल्याचे ऐकायला मिळते.
सायरनचं कामं नेमकं कसं असतं?
हल्ला करताना ज्यावेळी शत्रूच्या बाजूने कोणतेही रॉकेट, लढाऊ विमान किंवा क्षेपणास्त्र आपल्या देशाच्या हवाई क्षेत्रात एन्ट्री करतात तेव्हा हवाई दलाचे रडार लगेच ते पकडते आणि यावरून आपल्याला शत्रूबद्दल माहिती मिळते. शत्रू देशाने डागलेल्या क्षेपणास्त्राची दिशा आणि त्याचा वेग लक्षात घेऊन हल्ल्याच्या संभाव्य भागात रेड अलर्ट जारी केला जातो. यामुळे, हल्ल्याच्या संभाव्य ठिकाणी काही वेळ आधीच सायरन वाजवला जातो आणि लोकांना फक्त एक मिनिटभर स्वतःला जीव वाचण्यासाठी वेळ मिळतो.