Operation Sindoor : पाकिस्तानविरोधातील एअर स्ट्राइकबद्दल 10 मोठे मुद्दे

पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करून भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेतला आहे. या ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली. या पत्रकार परिषदेतील दहा मोठे मुद्दे जाणून घेऊयात..

Operation Sindoor : पाकिस्तानविरोधातील एअर स्ट्राइकबद्दल 10 मोठे मुद्दे
Indian Armed Forces Press Conference
Image Credit source: ANI
| Updated on: May 07, 2025 | 11:37 AM

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याच्या काही तासांतच भारतीय सैन्य आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी अमजल कसाब आणि डेव्हिड हेडली यांनी प्रशिक्षण घेतलेले तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. नवी दिल्लीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकारांना याबद्दलची माहिती दिली. या पत्रकार परिषदेतील दहा मोठे मुद्दे पाहुयात..

  1. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी हल्ला केला. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित समूह TRF ने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. 26/11 हल्ल्यानंतर पहलगाममधील हल्ला हा सर्वांत गंभीर होता
  2. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे दहशतवाद्यांसोबतचे संबंध पुन्हा एकदा समोर आले आहेत. दहशतवाद्यांचं शरणस्थळ ही पाकिस्तानची ओळख बनली.
  3. हल्लेखोरांना न्यायाच्या कक्षेत आणावं असं ठरलंय. पाकिस्तानमधून भारतात आणखी हल्ले होऊ शकतात, अशी गुप्त माहिती आहे. एअर स्ट्राइक करून भारताने आपला उत्तर देण्याच्या अधिकारांचा वापर केलाय.
  4. लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणी करताना भारताने बराच संयम दाखवला आहे. यात कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य केलेलं नाही.
  5. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर आणि मुरीदके हे लक्ष्य होतं. राजस्थानच्या सीमेजवळ असलेलं बहावलपूर हे मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी गटाचा बालेकिल्ला असल्याचं अधिकाऱ्यांनी ओळखलं.
  6. लाहोरमधील मुरीदके हे शहर लष्कर-ए-तैयबाचं तळ म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली आणि मुझफ्फराबादमधील ठिकाणांवरही हल्ला करण्यात आला. या दोन्ही ठिकाणांचा संबंध दहशतवादी कारवायांशी जोडला आहे.
  7. “कोणत्याही सैन्य ठिकाण्याला निशाणा करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही नागिरकांचा यात मृत्यू झाल्याचा रिपोर्ट अद्याप समोर आला नाही,” असं कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं.
  8. “जम्मू-काश्मीरमधील सामान्य परिस्थिती बिघडवण्याच्या उद्देशाने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. हा हल्ला अत्यंत क्रूर होता. देशभरात जातीय दंगल भडकवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता”, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले.
  9. पाकिस्तानने दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून जागतिक स्तरावर ख्याती मिळवली आहे. आंतरराष्ट्रीय दबावानंतर साजिद मीर जिवंत सापडल्याचं प्रकरण याचाच पुरावा आहे. शिवाय पाकिस्तान त्यांच्या नियंत्रणाखालील भागात दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई करत नाही.
  10. भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी अमजल कसाब आणि डेव्हिड हेडली यांनी प्रशिक्षण घेतलेले तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे.