
पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्यदलांनी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी रविवारी तिन्ही सैन्यदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली. चार दिवस चाललेल्या या मोहिमेची त्यांनी पुराव्यांसह सविस्तर माहिती दिली. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या समन्वयातून अचूक आणि जलदगतीने मोहिमा फत्ते केल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. या पत्रकार परिषदेतील सर्वांत लक्षवेधी गोष्ट ठरली, ती म्हणजे त्याची सुरुवात. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काही व्हिडीओ दाखवण्यात आले. या व्हिडीओमध्ये शिव तांडव स्तोत्राची धुन ऐकायला मिळाली.
भगवान शंकराला समर्पित शिव तांडव स्तोत्र हे अत्यंत शक्तीशाली आणि फलदायी मानलं जातं. या स्तोत्राची रचना शिवभक्त रावणाने केली होती. तिन्ही सैन्यदलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दाखवलेल्या कारवाईच्या व्हिडीओत शिव स्तोत्राची धुन ऐकून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘ज्या दहशतवाद्यांना कलमा म्हणायला लावून निष्पाप पर्यटकांवर गोळी झाडली, त्यांना हे उत्तर आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘मला अजूनही माझ्या कानांवर विश्वास बसत नाहीये’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
पुराणांमधील उल्लेखानुसार एकदा रावणाने आपल्या शक्तीच्या आणि गर्वाच्या जोरावर भगवान शिवाचं निवासस्थान असलेल्या कैलाश पर्वताला उचलण्याचा प्रयत्न केला. रावणाचा हा उद्धटपणा पाहून शंकराने आपल्या अंगठ्याने तो पर्वत दाबला. यामुळे रावणाचा हात पर्वताखाली अडकला आणि तो असह्य वेदनेनं व्याकूळ झाला. पण तरीही रावणाने हार मानली नाही. वेदनेतही तो भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत भावनिक स्तुती गाऊ लागला. त्याची स्तुती इतकी प्रभावी आणि शक्तीशाली होती की शिव स्वत: प्रसन्न झाले. हीच स्तुती नंतर शिव तांडव स्तोत्र या नावाने प्रसिद्ध झाली. या स्तोत्रात रावणाने भगवान शंकराच्या तांडव स्वरुपाचं, त्यांच्या दिव्य तेजाचं आणि सौंदर्याचं वर्णन केलं आहे.
दरम्यान ऑपरेशन सिंदूरमध्ये किमान 100 दहशतवादी आणि पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक मारले गेल्याची माहिती डीजीएमओ लेफ्ट. जनरल राजीव घई यांनी दिली. पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईला दिलेल्या प्रत्युत्तरात त्यांचं मोठं नुकसान झाल्याचंही ते म्हणाले. यापुढे कोणतीही आगळीक झाली, तर त्याला अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दांत पाकिस्तानला खडसावण्यात आलं आहे.