भारताचा दिलदारपणा! अधिकाऱ्यांची थेट पाकिस्तानला मदत… नेमकं काय केलं? जाणून घ्या

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. मात्र आता भारताने दिलदारपणा दाखवत पाकिस्तानला मदत केल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारताचा दिलदारपणा! अधिकाऱ्यांची थेट पाकिस्तानला मदत... नेमकं काय केलं? जाणून घ्या
ind and pak
| Updated on: Aug 25, 2025 | 3:50 PM

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. मात्र आता भारताने दिलदारपणा दाखवत पाकिस्तानला मदत केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये पुरस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे नुकसान आणखी वाढू नये म्हणून भारताकडून पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पुराची माहिती देण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानने पहिल्यांदाच एकमेकांशी संपर्क साधला आहे. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. भारताने पाकिस्तानला तावी नदीला येणाऱ्या संभाव्य पुराबद्दल इशारा दिला आहे. ही नदी जम्मूमधून पाकिस्तानच्या पंजाबमध्ये प्रवेश करते. या भागात सध्या पुरस्थिती आहे, त्यामुळे अधिकचे नुकसान टाळण्यासाठी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाने पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी नागरिकांना पुराचा इशारा जारी केला आहे.

सिंधू कराराशी काहीही संबंध नाही

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला होता. यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलत पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद् केला होता. तसेच ऑपरेशन सिंदूर सुरू करत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला होता. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

सैन्य चकमक झाल्यानंतर 10 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा निर्णय झाला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पूरामुळे पाकिस्तानात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नदीच्या पाण्याची माहिती पाकिस्तान सरकारला दिली आहे. मात्र याचा सिंधू पाणी कराराशी काहीही संबंध नाही.

सिंधू पाणी करार काय आहे?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून या कराराची चर्चा होत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील नद्यांचे पाणी विभागण्यासाठी 1960 मध्ये हा करार करण्यात आला होता. मात्र भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याने भारताने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानची शेती आणि अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे.

 

Follow Us