
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे सध्या जगभरात इंधनाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अनेक जहाजं हे तिथेच अडकून पडल्यानं अनेक देशांमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जणावत आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर भारतासाठी काही दिलासादायक घटना घडताना दिसत आहेत, त्यामुळे भारतामध्ये आता लवकरच इंधन टंचाईची समस्या दूर होण्याची शक्यता आहे. इराणने आपल्या काही मित्र राष्ट्रांसाठी स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू केला आहे, त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. त्यामुळे या मार्गाने भारतात कच्चं तेल आणि नॅचरल गॅस येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे आता रशिया देखील भारताच्या मदतीला धावून आला आहे.
रशियाचं युक्रेनसोबत युद्ध सुरू असताना रशियानं भारताला कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली होती. तेव्हा भारतानं मोठ्या प्रमाणात रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केली. मात्र अमेरिकेसोबत करार झाल्यानंतर भारतानं रशियाकडून सुरू असलेली तेलाची खरेदी काही प्रमाणात कमी केली होती. दम्यान त्यानंतर इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालं. इराणने स्ट्रेट ऑफ होमूर्ज बंद केला, या पार्श्वभूमीवर भारतानं पुन्हा एकदा रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली. मात्र यावेळी रशियाकडून भारताला कोणत्याही प्रकारची सूट कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये देण्यात आलेली नाही, उलट दर वाढवण्यात आले आहेत. मात्र जरी असं असलं तरी या युद्धामुळे अनेक देश रशियाकडून तेलाची खरेदी करण्यासाठी तुटून पडलेले असताना, रशियानं मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे कच्च्या तेलाच्या विक्रीसाठी भारतालाच प्राथमिकता दिली जात आहे.
काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर असताना त्यांनी रशिया भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा कधीही कमी पडू देणार नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर आता रशियानं आपला शब्द खरा केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये भारताला प्राथमिकता देण्यात येत आहे. एवढंच नाही तर आता भारतानं हे इंधन संकट दूर करण्यासाठी आता आर्जेंटीना आणि अमेरिकेकडून देखील कच्च्या तेलाची खरेदी करत आहे.