मोठी बातमी! ऐन युद्धात भारताचा अमेरिकेला मोठा झटका, ट्रम्प हात चोळत बसले, शेवटी भारताने तो निर्णय घेतलाच
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका, इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असतानाच भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.

इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मूजची सामुद्रधुनी बंद केली आहे. जगातील जवळपास 25 टक्के कच्चं तेल आणि एलपीजी गॅसची वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे सध्या जगभरात मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. मात्र दुसरीकडे या युद्धामुळे आता भारताचा फायदा होताना दिसत आहे. याबाबत तेल मंत्रालयाकडून माहिती जारी करण्यात आली आहे. भारताने आता इराणकडून तेलाची खरेदी केली आहे. यामुळे तूर्तास तरी भारतावरील ऊर्जा संकट टळलं आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. मे 2019 नंतर अमेरिकेच्या दबावामुळे भारतानं इराणकडून एकाही तेलाच्या जहाजाची खरेदी केली नव्हती. मात्र त्यानंतर आता अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे पुरवठा साखळी बाधित झाली आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा कमी पडत आहे, त्यामुळे आता भारतानं पुन्हा एकदा इराणकडून तेल खरेदी सुरू केली आहे.
याबाबत तेल मंत्रालयाकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. ‘मध्य पूर्वेतील पुरवठा साखळी बाधित झालेली असताना देखील भारतानं मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. त्यामुळे देशावरील ऊर्जा संकट दूर झालं आहे. भारतानं इराणकडून देखील तेलाची खरेदी केली आहे. आयातीचे देयक देण्यामध्ये देखील कोणतीच अडचण नाहीये.’ अशी माहिती मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या महिन्यात जागात ऊर्जा संकट निर्माण होऊ नये, यासाठी अमेरिकेकडून इराणच्या कच्च्या तेलावर घालण्यात आलेले प्रतिबंध देखील हटवण्यात आले आहेत. त्यामुळे याचा देखील भारताला मोठा फायदा होताना दिसत आहे. पुढील काही महिन्यांसाठी भारतानं आपली ऊर्जेची गरज पूर्ण केल्याचा दावा देखील तेल मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.
भारत सध्या जवळपास 40 देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी करत आहे, त्यामुळे भारत सरकारकडून रिफायनरी कंपन्यांना तेल खरेदीबाबत पूर्णपणे सूट देण्यात आली आहे, त्यांना जिथून कच्चं तेल अधिक स्वस्त वाटत असेल तिथून ते तेलाची खरेदी करू शकतात, असं सरकारने म्हटलं आहे. दुसरीकडे रशियाकडून देखील भारताला मोठी ऑफर देण्यात आली आहे, भारताला जेवढी गरज असेल तेवढ्या प्रमाणात कच्चं तेल पुरवण्याची तयारी रशियानं दाखवली आहे, त्यामुळे भारताला याचा मोठा फायदा होणार आहे.