जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील फरक काय? अर्थव्यवस्था, प्रशासन, आव्हानांचा सविस्तर आढावा
PM Modi vs Jawaharlal Nehru : पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग सर्वाधिक काळ लोकशाही पद्धतीने देश चालवणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. ते जवाबहलाल नेहरू यांच्या 4,398 दिवसांच्या विक्रमाला मागे टाकतील. या दोन्ही नेत्यांच्या कार्यशैलीची माहिती जाणून घेऊयात.

नवी दिल्ली, 5 जून : येत्या 10 जून रोजी भारतीय राजकारणात एक जुना विक्रम इतिहासजमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग सर्वाधिक काळ लोकशाही पद्धतीने देश चालवणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. यासह ते देशाचे पहिले पंतप्रधान जवाबहलाल नेहरू यांच्या 4,398 दिवसांच्या विक्रमालाही मागे टाकतील. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर नेहरू आणि मोदी यांच्या कार्यकाळातील प्रशासनशैली आणि बदलत्या भारताचे काही महत्त्वाचे पैलू जाणून घेऊया.
पूर्वी राजकारण म्हणजे फक्त सभा आणि निवडणुकांपुरते मर्यादित होते. मात्र आजच्या सोशल मीडिया युगात राजकीय नेत्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. अशा कठीण परिस्थितीतही पंतप्रधान मोदी सातत्याने सक्रिय आणि प्रभावी नेतृत्व करत आहेत. 10 जून रोजी ते नेहरूंचा विक्रम मोडणार आहेत.
पिढ्यांमधील समन्वय
बदलत्या पिढ्यांमध्येही आपली राजकीय आणि भावनिक लोकप्रियता टिकवून ठेवणारे नेते फार कमी असतात. मात्र पंतप्रधान मोदी एका कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांशी जोडले गेले आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना मत दिले होते, त्यांचा मुलगा आणि त्याच कुटुंबातील नातवानेही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनाच मत दिल्याचे उदाहरण दिले जाते. त्यामुळे ते तीन पिढ्यांचे आवडते नेते ठरले आहेत.
आव्हानांच्या काळातील नेतृत्व
कोविड-19 महामारी, आंतरराष्ट्रीय युद्धे, दहशतवाद, आर्थिक संकटे आणि जागतिक राजनैतिक संतुलन राखण्याची गरज अशा अनेक मोठ्या संकटांच्या काळात पंतप्रधान मोदी देशाचे नेतृत्व करत आहेत. नेहरूंच्या काळाच्या तुलनेत आजची आव्हाने अधिक कठीण आणि पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाची मानली जातात.
लोकचळवळ बनलेले प्रशासन
जवाबहलाल नेहरू यांच्या काळातील प्रशासनशैली मोठ्या प्रमाणात ‘टॉप-डाउन’ स्वरूपाची होती. निर्णय प्रामुख्याने राजकीय नेते आणि नोकरशाही घेत असे. पण मोदींच्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या संकल्पनेमुळे लोकसहभागावर भर देत प्रशासनाला ‘जनचळवळी’चे स्वरूप मिळाल्याचे सांगितले जाते.
सामान्य माणसाच्या क्षमतेवर विश्वास
नेहरूंच्या समाजवादी धोरणांमध्ये सरकारी नियंत्रण आणि प्रशासकीय व्यवस्थेला प्राधान्य होते. तर मोदी सरकार सामान्य भारतीयांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांच्या सक्षमीकरणावर भर देत असल्याचा दावा केला जातो.
सामूहिक राष्ट्रीय मिशन
नेहरूंच्या काळात देशाचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी मानली जात होती. मात्र मोदी यांच्या काळात देशाची प्रगती ही प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून साध्य होणारे ‘सामूहिक राष्ट्रीय मिशन’ म्हणून मांडली जात आहे.
वाढती लोकसंख्या आणि राजकीय स्पर्धा
नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा देशाची लोकसंख्या सुमारे 34 कोटी होती. आज मोदी नेतृत्व करत असलेल्या भारताची लोकसंख्या 146 कोटींहून अधिक आहे. 1951 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत फक्त 53 पक्ष मैदानात होते, तर 2024 च्या निवडणुकीत तब्बल 744 पक्षांनी सहभाग घेतला. नेहरूंच्या काळातील एकपक्षीय वर्चस्वाच्या तुलनेत आज प्रादेशिक पक्षांची स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
अर्थव्यवस्था आणि जागतिक स्थान
नेहरूंच्या काळात भारताचा GDP वाढदर सुमारे 3.5 टक्के होता. तर कोविडसारख्या जागतिक संकटांनंतरही मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत 6.5 ते 7 टक्के वाढीसह जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. भारत 2014 मध्ये जगातील 10व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता, तर 2025-26 मध्ये तो चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आल्याचे सांगितले जात आहे.