डियर अमिताभ… लोकलच्या तुफान गर्दीचा व्हिडीओ शेअर, काँग्रेसने का साधला बिग बींवर निशाणा ?

केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने एक अनोखी शक्कल लढवली आहे. केरळ काँग्रेसने गुरुवारी उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथील खचाखच भरलेल्या एका ट्रेनचा व्हिडीओ शेअर केला. मात्र त्या सोबत लिहीलेल्या कॅप्शननेच सर्वांचे लक्ष वेधले.

डियर अमिताभ... लोकलच्या तुफान गर्दीचा व्हिडीओ शेअर, काँग्रेसने का साधला बिग बींवर निशाणा ?
| Updated on: May 31, 2024 | 11:04 AM

भारतीय रेल्वेची अवस्था किती बिकट आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. गेल्या काही वर्षांपासून ट्रेनमध्ये गर्दी प्रचंड वाढत आहे हे रेल्वेने प्रवास करणारे जवळपास सर्वच प्रवासी मान्य करतील. पूर्वी, मध्यमवर्गीय कुटुंबे त्यांच्या प्रवासाच्या बजेटमध्ये बसू शकतील आणि गर्दी टाळता यावी म्हणून एसी 3 टियर तिकिटे खरेदी करत असत. मात्र आता एसी डब्यांची अवस्थाही सर्वसामान्यांसारखी झाली आहे. स्लीपर आणि जनरल डब्यातील गर्दीबद्दल बोलताच येणार नाही.

आता याच मुद्यावरून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने एक अनोखी शक्कल लढवली आहे. केरळ काँग्रेसने गुरुवारी उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथील खचाखच भरलेल्या एका ट्रेनचा व्हिडीओ शेअर केला. मात्र त्या सोबत लिहीलेल्या कॅप्शननेच सर्वांचे लक्ष वेधले. या कॅप्शनमध्ये त्यांनी सुरूवातीला प्रिय अमिताभ बच्चन असे लिहीले होते आणि बिग बी यांचे अकाऊंटही टॅग करण्यात आले. केंद्र सरकार केवळ सेलिब्रिटींचे म्हणणे ऐकत, त्याकडे लक्ष देते असा तर्क लावत काँग्रेसने हे ट्विट केले आहे.

व्हिडीओद्वार वेधले लक्ष

आपल्या या पोस्टमध्ये केरळ काँग्रेसने वैशाली एक्सप्रेसच्या डब्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही ट्रेन बिहारच्या सहरसा येथून राजधानी दिल्लीपर्यंत येते. शेअर केलेल्या या व्हिडीओत गर्दीने खचाखच भरलेला डबा दिसत असून लोक गरमीमुळे वैतागले आहेत. प्लास्टिकच्या पंख्यांनी वारा घालून जरा आराम मिळवण्याचा लोकांचा प्रयत्न आहे.

तसेच या व्हिडिओमध्ये लोक वरच्या बर्थच्या मध्यभागी झुल्यासारखे कपडे बांधून त्यामध्ये तर काहींनी जमिनीवर पथारी पसरली. जिथे ३-४ लोक मावू शकतात, त्या ठिकाणी 7-8 दाटीवाटीने बसले आहेत. अनेक प्रवासी बेहाल झाले असून अतिशय वैतागल्याचे त्यामध्ये दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांचा उल्लेख

हा व्हिडीओ शेअर करताना केरळ काँग्रेसने अमिताभ बच्चन यांचं X ( ट्विटर) अकाऊंट टॅग केलंय. केरळ काँग्रेसने अमिताभ बच्चन यांच्याकडे विनंती करत एक मदतही मागितली. ‘आम्हाला तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी आहे. कोट्यवधी सामान्य लोकांना असाच प्रवास करावा लागतो. एवढंच नव्हे तर रिझर्व्हेशनचे डब्बेही खचाखच भरलेले आहेत. उत्तर भारतात तापमानाचा पारा 52°C वर पोहोचलाय आणि हा व्हिडीओ गोरखपुर येथील आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही तेथीलच आहेत. ‘ असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

 

 

बिग बींना का टॅग केलं ?

आपण या पोस्टमध्ये बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांना का टॅग केलं याचं स्पष्टीकरणही केरळ काँग्रेसने दिलं आहे.गर्दीची समस्या सोडवण्यासाठी ट्रेन्सची संख्या वाढवण्याच्या पक्षाच्या मागणीकडे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुर्लक्ष केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींद्वारे मांडल्या गेलेल्या मुद्यांकडे ते ( रेल्वे मंत्री) त्वरित लक्ष देतात, प्रतिक्रिया देतात. भलेही ती विनंती हॅक झालेल्या ट्विटर अकाऊंटबद्दल असली तरी तत्परतेने प्रतिक्रिया दिली जाते, असा टोमणाच केरळ काँग्रेसने लगावल.

अखेर रेल्वेच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी केरळ काँग्रेसने अमिताभ बच्चन यांच्या स्टारडमचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. “तुमचा प्रभाव आणि सामाजिक कारणांबद्दलची बांधिलकी लक्षात घेता, आम्ही तुम्हाला या प्रकरणाबद्दल ट्विट करण्याची विनंती करतो. तुमचा पाठिंबा या लोकांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यात मदत करू शकतो आणि संभाव्य कारवाई होऊ शकते” असे ट्विट त्यांनी अमिताभ यांना उद्देशून केले आहे.