शेतकरी प्रचंड आक्रमक, बसवर चढले… थेट सीएम हाऊसकडे आंदोलकांची कूच; पोलिसांना फुटला घाम
MP Farmers Protest : मध्य प्रदेशातील शेतकरी MSP वर मूगाची 100 टक्के खरेदी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी राजधानी भोपाळमध्ये आंदोलन करत आहेत. यामुळे भोपाळमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्राच्या शेजारील मध्य प्रदेश या राज्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत. MSP वर मूगाची 100 टक्के खरेदी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी राजधानी भोपाळमध्ये आंदोलन केले. नर्मदापूरम, हरदा, सीहोर, रायसेन आणि विदिशा यांसह 19 शेतकरी संघटनांतील हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडत भोपालमधील वीर सावरकर सेतू पार केला करत मुख्यमंत्र्यांच्या निवासाकडे जाण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आज सायंकाळी शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य प्रदेशातील शेतकरी आक्रमक
आज भोपाळमध्ये आंदोलक शेतकरी बसच्या छतावर चढून घोषणाबाजी करताना दिसले. यावेळी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र आक्रमक शेतकऱ्यांपुढे पोलीस हतबल झाल्याचे पहायला मिळाले. राजधानीत निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘आमचे सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. सकारात्मक सूचनांच्या माध्यमातून संवादातूनच समस्यांचे निराकरण करण्यावर आमचा भर आहे. सामान्य जनतेला कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सरकारने यासाठी विशेष समिती स्थापन केली असून ती शेतकरी बांधवांशी सातत्याने संवाद साधत आहे.’
शेतकरी आक्रमक का झाले?
सरकारने निश्चित केलेल्या मूग खरेदीच्या मर्यादेविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत. एका एकरात सरासरी 4 ते 5 क्विंटल मूग उत्पादन होते. मात्र, सरकार MSP वर केवळ 1.20 क्विंटल मूगाचीच खरेदी करत आहेत. उर्वरित 3 ते 4 क्विंटल मूग शेतकऱ्यांना बाजारात केवळ 4,000 ते 5,500 रुपये प्रति क्विंटल या कमी दराने विकावी लागत आहे. या आर्थिक नुकसानीमुळे आणि MSP वर शंभर टक्के खरेदीच्या मागणीसाठी नर्मदापूरम येथून सुरू झालेला किसान मार्च आता राजधानीत पोहोचला आहे.
कृषिमंत्र्यांनी घेतली शेतकरी प्रतिनिधींची भेट
मंगळवारी उशिरा रात्री कृषिमंत्री एदल सिंह कंषाना यांनी भोपालमधील आपल्या कार्यालयात आंदोलन करणाऱ्या शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. यानंतर त्यांनी सांगितले की, ‘शेतकऱ्यांच्या विशेष मागण्या, विशेषतः मूग खरेदीसंदर्भातील मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करेल.’ त्यानंतर कंषाना यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यास आणि मूग खरेदीसह इतर विषयांवर तातडीने आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली आहे.
