आजापसून काँग्रेसची कमान खर्गे यांच्या हाती…; दिग्गजांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारणार…

| Updated on: Oct 26, 2022 | 7:00 AM

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात दावा केला होता. या निवडणुकीत खर्गे यांनी शशी थरूर यांचा 6,825 मतांनी पराभव केला होता.

आजापसून काँग्रेसची कमान खर्गे यांच्या हाती...; दिग्गजांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारणार...
Follow us on

नवी दिल्लीः मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आज काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) सूत्रे स्वीकारणार आहेत. काँग्रेसमध्ये 24 वर्षानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरच्या (Gandhi Family) व्यक्तीचा अध्यक्ष म्हणून निवड केली गेली आहे. त्यांना अध्यक्ष करणे म्हणजे घराणेशाहीची टीका करणाऱ्या भाजपला ते सडेतोड उत्तर आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांना हे पद मिळाले असले तरी त्यांचा कार्यकाळ हा प्रचंड खडतर असणार आहे. कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच दोन वर्षांत काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात सकाळी 10:30 वाजता सोनिया गांधी, राहुल गांधी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाची ते सूत्रे स्वीकारणार आहेत.

अध्यक्ष पद स्वीकारण्यापूर्वी ते सकाळी ८ वाजता ते राज घाट, शांती वन, विजय घाट, शक्तीस्थळ, वीरभूमी आणि समता स्थळाला भेट देणार आहेत.

खर्गे यांनी मंगळवारी सायंकाळी 6 वाजता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात दावा केला होता. या निवडणुकीत खर्गे यांनी शशी थरूर यांचा 6,825 मतांनी पराभव केला होता.

खर्गे यांना 7897 मते मिळाली होती. त्याचवेळी शशी थरूर यांच्या खात्यात 1072 मते आली.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निमित्त 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. याआधी सीताराम केसरी हे गांधी घराण्याबाहेरचे अध्यक्ष होते. काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निमित्ताने दलित व्होट बँकेला काँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेसच्या् राजकारणात दलित व्होट बँक नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे.

त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवडीमुळे दलित व्होट बँकेला शाबूत कसं ठेवायचं हे आता येणारा काळच ठरविणार आहे.