उद्धव ठाकरे जे म्हणाले तोच ममता बॅनर्जींचा संदेश, 21 जुलैनंतर…पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार?

ममता बॅनर्जी यांची साथ सोडणाऱ्या रुक्मीणी मल्लिक यांनी 6 एप्रिल रोजी राज्यसभेच्या सदस्यत्त्वाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा नेमका का दिला, याचे कोणतेही कारण अद्याप त्यांनी सांगितलेले नाही.

उद्धव ठाकरे जे म्हणाले तोच ममता बॅनर्जींचा संदेश, 21 जुलैनंतर...पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार?
mamata banerjee
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 16, 2026 | 9:30 PM

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एकावर एक धक्के बसत आहे. अनेक खासदार आणि आमदार यांनी पक्ष सोडल्यानंतर आता बंगाली सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रुक्मणी मल्लिक उर्फ कोयल मल्लिक यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा म्हणजे ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या राजीनाम्यानंतर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना कोणाला पक्ष सोडायचा आहे, ते सोडू शकतात, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. तसेच ज्यांना कोणाला पक्षातून जायचे आहे त्यांनी 21 जुलैपूर्वीच जावे, असं ठणकावून सांगितलं आहे.

ज्या खासदाराने राजीनामा दिलेला आहे, त्या खासदराने भाजपाच्या एका नेत्याची भेट घेतली आहे. मी या खासदाराचे आभारच मानते. या खासदाराने मला ईमेलच्या माध्यमातून अगोदरच सांगितलेले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्या रुक्मिणी मल्लिक यांच्याबाबत बोलत होत्या.

ममता बॅनर्जी यांनी विरोधकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. आमच्या पक्षातील नेत्यांवर पक्षबदलासाठी दबाव टाकला जात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 21 जुलै रोजी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसतर्फे शहीद दिवस साजरा केला जातो. या 21 जुलैनंतर आमचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष वेगळ्या संकल्पाने तसेच वेगळी रणनीती घेऊन पुढे मार्गक्रमण करणार आहे, असेही यावेळी ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये दरवर्षी 21 जुलै रोजी टीएमसीकडून ‘शहीद दिवस’ पाळला जातो. पक्षाच्या दृष्टीने हा सर्वात महत्त्वाच्या राजकीय कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. या कार्यक्रमात आता ममता बॅनर्जी नेमकं काय बोलणार, पक्षासाठी नेमका कोणता कार्यक्रम राबवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान ममता बॅनर्जी यांची साथ सोडणाऱ्या रुक्मीणी मल्लिक यांनी 6 एप्रिल रोजी राज्यसभेच्या सदस्यत्त्वाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा नेमका का दिला, याचे कोणतेही कारण अद्याप त्यांनी सांगितलेले नाही. याआधी ममता बॅनर्जी यांची अनेक खासदार आणि आमदारांनी साथ सोडलेली आहे. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही काही खासदारांनी त्यांची साथ सोडलेली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील ज्यांना कोणाला पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी जावे असे सांगितलेले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे भविष्यात नेमकी कोणती राजकीय रणनीती आखतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us