बायकोचा मृतदेह खांद्यावर घेऊन तो निघाला, कुणालाच दया आली नाही, 33 किमी गेल्यावर अखेर ‘माणूस’ सापडला…

रुग्णालय प्रशासन तसेच 33 किमी अंतर रस्त्यावरील माणसांनी गुरुच्या हतबलतेची किंचितही दया कशी आली नाही? माणसातली माणूसकी एवढी संपून जातेय का? असा सवाल या घटनेनंतर विचारला जातोय.

बायकोचा मृतदेह खांद्यावर घेऊन तो निघाला, कुणालाच दया आली नाही, 33 किमी गेल्यावर अखेर माणूस सापडला...
Image Credit source: social media
| Updated on: Feb 09, 2023 | 2:43 PM

कोरापूत, आंध्र प्रदेशः ते दोघं मजूर. रोजंदारीवर काम करणारे. अचानक पत्नी आजारी पडली. त्यानं खासगी हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखवलं. उपचार (Treatment) सुरु झाले. पण पत्नीची तब्येत खालावली अन् अखेर तिनं मृत्यूला कवटाळलं. मजुराचं जगणं ते. हातावर पोट भरणारे. होती नव्हती सगळी कमाई उपचारासाठी खर्च झाली. पण पत्नीवर आपल्या गावी नेऊन अंत्यसंस्कार करण्याची त्याची इच्छा होती. रुग्णालयात मदत मागितली. गावापर्यंत पोहोचवा म्हणून विनंती केली. रुग्णालयानं साफ नकार दिला. इतर चार लोकांनीही झिडकारून लावलं.

त्यानं काळीज घट्ट केलं. पत्नीचा मृतदेह खांद्यावर टाकला अन् थेट निघाला. पायांची चाकं अन् पाठिची गाडी. तब्बल 33 किलोमीटर गेल्यानंतर कुणीतरी तो खांद्यावर मृतदेह घेऊन जातोय, अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला थांबवलं. नेमका काय प्रकार आहे, याची चौकशी केली अन् काळीज पिळवटून टाकणारं सत्य समोर आलं. अखेर त्या पोलिसातलाच माणूस जागा झाला, त्यानं या माणसाला मदत केली.

कुठे घडली घटना?

ही घटना आहे आंध्र प्रदेशातली. कोरापूत जिल्हा पत्तंगी तालुका. इथली. गुरू आणि त्याची पत्नी पत्तंगी येथील राहणारे. दोघंही रोजंगारीवर काम करण्यासाठी विशाखापट्टणम् येथे जात होते. अचानक गुरुच्या पत्नीची प्रकृती खालावली. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला.

सागरबालसा येथील खासगी रुग्णालयात ही घटना घडली. बुधवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. बुधवारी रात्री तिचा मृतदेह पत्तंगी या गावी नेण्याचं त्यानंतर ठरवलं. रुग्णालय प्रशासनाला मृतदेह गावापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. मात्र रुग्णालयाने काडीचीही मदत केली नाही.

हताश झालेल्या गुरुने इतरही अनेक जणांकडे याचना केली. पण उपयोग झाला नाही. उपचारासाठी सगळेच पैसे खर्च झाले होते. गुरूकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावर टाकला आहे. निघाला गावाच्या दिशेने.

आंध्र प्रदेशातल्या चकाचक रस्त्यावर हा माणूस बायकोचा मृतदेह खांद्यावर घेऊन निघालेला अनेकांनी पाहिला. पण कुणीही मदतीला पुढे आले नाही. तब्बल ३३ किमी अंतर चालल्यानंतर एकाने याची माहिती पोलिसांना दिली.

विजयनगर जवळ पोलिसांनी गुरुला गाठलं. चौकशी केली असता पैसे नाहीत म्हणून गुरु अशा प्रकारे पत्नीचा मृतदेह घेऊन चाललाय हे कळलं तेव्हा त्या पोलीस कर्मचाऱ्यातली माणुसकी जागी झाली.

विजयनगर ग्रामीण पोलीस एसआय किरण कुमार यांनी गुरुला मदत केली. पत्नीचा मृतदेह गावी पोहोचवण्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्था केली. विजय नगर येथील पोलिसांनं दाखवलेली ही माणूसकी आज कौतुकाचा विषय ठरली आहे.

रुग्णालय प्रशासन तसेच 33 किमी अंतर रस्त्यावरील माणसांनी गुरुच्या हतबलतेची किंचितही दया कशी आली नाही? माणसातली माणूसकी एवढी संपून जातेय का? असा सवाल या घटनेनंतर विचारला जातोय.