Mehbooba Mufti House Arrest: मेहबुबा मुफ्ती अनिश्चित काळासाठी नजर कैदेत, केंद्र सरकारवरील टीका भोवली?

| Updated on: Nov 18, 2021 | 12:21 AM

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना अश्चित काळासाठी घरातच नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.

Mehbooba Mufti House Arrest: मेहबुबा मुफ्ती अनिश्चित काळासाठी नजर कैदेत, केंद्र सरकारवरील टीका भोवली?
mehbooba mufti
Follow us on

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना अश्चित काळासाठी घरातच नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांनी गेल्या काही दिवसांपासून अतिरेक्यांचं एन्काऊंटर सुरू केलं आहे. त्यावरून मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर सातत्याने हल्ला चढवला होता. तसेच अतिरेकी आणि जवानांच्या चकमकीत दोन नागरिक मारल्या गेल्याने मृतांच्या कुटुंबीयाने निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असताना मुफ्ती यांना रोखण्यात आलं आणि त्यांना पुढील आदेश येईपर्यंत नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे.

मेहबुबा मुफ्ती या जम्मूला गेल्या होत्या. तिकडून येत असताना हैदरपोरा येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या चकमकीत ठार झालेल्या दोन नागरिकांच्या कुटुंबीयांनी निदर्शने आयोजित केली होती. या निदर्शनात सहभागी होण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांना निदर्शनाच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच त्यांना तात्काळ नजर कैदेत ठेवण्यात आले.

मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवा

मुफ्ती यांनी गोळीबारात सामान्य नागरिक मारले गेल्याने त्याविरोधात बुधवारी निदर्शने केली. तसेच मारलेल्या नागरिकांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्याची मागणीही त्यांनी केली. सशस्त्र दल विशेषाधिकार धिनियम जेव्हापासून लागू झाला आहे. तेव्हापासून निष्पाप लोकांना मारलं तरी त्यावर सरकार उत्तर देत नाही, असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. सोमवारी दहशतवाद विरोधी अभियानाच्या दरम्यान सुरक्षा दलाच्या गोळीबारात दोन नागरिकांसह चार लोक मारले गेले होते.

हैदरपुरा एन्काउंटरवर पोलिसांचा खुलासा

हैदरपुरा परिसरात झालेल्या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी आणि त्याचा स्थानिक साथीदार मोहम्मद आमिरच्यासह दोन नागरिक मारले गेले. अल्ताफ भट आणि मुदस्सिर गुल असं या दोन नागरिकांची नावे आहेत. या ठिकाणी बेकायदेशीर कॉल सेंटर होते. तसेच दहशतवाद्यांचा तळही होता. गुल हा दहशतवाद्यांच्या जवळचा होता. तर भटच्या मालकीच्या परिसरातच कॉल सेंटर सुरू होतं. भटही या चकमकीत मारला गेला, असं काश्मीर रेंजचे पोलीस निरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं.

आम्हाला मारणं बंद करा

कुमार यांनी भटच्या मृत्यूवर दिलगीरी व्यक्त केली. मात्र दहशतवाद्यांना आश्रय देणारा म्हणून त्याच्या नावाचा समावेश असेल. मोहम्मद आमिरचे वडील लतीफ मगराय यांनी आपला मुलगा दहशतवादी नसल्याचं स्पष्ट केलं. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांनी कार्यकर्त्यांसह पक्षाच्या गांधीनगर येथील मुख्यालयाजवळ निदर्शने केली. आम्हाला मारणं बंद करा, हैदरपुरा प्रकरणाची चौकशी करा आणि मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करा, अशी वाक्य लिहिलेली पोस्टर्स त्यांच्या हातात होती.

त्यांना गोडसेचा देश बनवायचा आहे

ज्यांच्या घरातील ही दोन माणसे मारली गेली. त्यांच्या घरातील लोक श्रीनगरमध्ये निदर्शने करत आहेत. मृतदेह ताब्यात देण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, ही क्रूर सरकार हत्या केल्यानंतर मृतदेह सोपवण्यास नकार देत आहे. हे लोक गांधी, नेहरु आणि आंबेडकरांच्या या देशाला गोडसेंचा देश बनवू पाहत आहेत. मी अजून काय बोलू शकते? असा सवाल मुफ्ती यांनी केला आहे.

 

संबंधित बातम्या:

Kartapur Corridor Opens: गुरुद्वारा करतारपूर साहिबच्या दर्शनासाठी आलेल्या भारतीय भाविकांचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत

Kulbhushan Jadhav: अखेर, कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार मिळाला, पाकिस्तानच्या संसदेत विधेयक मंजूर

टीव्ही डिबेटमधून सर्वाधिक प्रदूषण, प्रत्येकजण आपला अजेंडा राबवतोय; सरन्यायाधीशांनी दाखवला आरसा