Monsoon : देशभर मान्सून सक्रीय, कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट..! महाराष्ट्राची स्थिती काय?

राज्यात कोकणानंतर विदर्भात पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे या भागात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून आता सोमवारपासून याच विभागात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे लागवड केलेल्या कापसाला याचा आधार मिळणारच आहे पण इतर पिकांच्या पेऱ्यासाठी पोषक वातावरण होणार आहे.

Monsoon : देशभर मान्सून सक्रीय, कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट..! महाराष्ट्राची स्थिती काय?
जुलैच्या पहिल्या आठवड्यात देशभर मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज आहे.
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 03, 2022 | 9:31 AM

मुंबई : यंदा कधी नव्हे ते तीन दिवस आगोदर (Monsoon) मान्सूचे आगमन झाले होते. देशात मान्सून दाखल होऊन महिना उलटला आहे. असे असतानाही सर्वच भागात मान्सूनचे सातत्य राहिले नाही तर त्याच्या लहरीपणाचा प्रत्यय आला आहे. दरवर्षी 8 जुलैपर्यंत मान्सून देश व्यापतो. यावर्षी मात्र 2 जुलैलाच सर्वत्र तो सक्रीय झाला असून (Kokan) कोकण आणि मुंबईवर अधिकची कृपादृष्टी राहिलेली आहे. तर आता जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसामध्ये अमूलाग्र बदल होणार असून कोकणासह विदर्भात हवामान विभागाकडून (Orange Alert) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता केवळ कोकणातच नाहीतर सबंध महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे पावसाने हजेरी लावली तरच खरिपातील पिके तरणार अन्यथा दुबार पेरणीचे संकट विदर्भासह मराठवाड्यावर घोंगावत आहे. मराठवाड्यात आठवड्याचा शेवट हा विजेच्या कडकडाटासह होणार असल्याचाही अंदाज आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?

3 ते 6 जुलै या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय होणार आहे. आतापर्यंत केवळ कोकण आणि मुंबईमध्येच पावसाची कृपादृष्टी राहिलेली होती. पण जुलै महिन्यात यामध्ये बदल होणार असल्याचा अंदाज आहे. यामुळेच पुढील तीन दिवस कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात पावसाचा जोर वाढणार

राज्यात कोकणानंतर विदर्भात पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे या भागात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून आता सोमवारपासून याच विभागात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे लागवड केलेल्या कापसाला याचा आधार मिळणारच आहे पण इतर पिकांच्या पेऱ्यासाठी पोषक वातावरण होणार आहे. राज्यातील अंतर्गत भागात पाऊस सक्रीय तर होणारच पण विदर्भातील काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाचे अतिरिक्त संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.

खरिपाच्या भवितव्यासाठी पाऊस गरजेचा

नाही म्हणलं तरी राज्यातील शेतकऱ्यांनी अल्पशा पावसाच्या जोरावर खरिपातील पेरण्या उरकल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने पेरण्या रखडल्या शिवाय अधिकचा वेळ झाला उत्पादनावर परिणाम होईल यामुळे शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली. आता मराठवाड्यातही पेरण्या उरकल्या गेल्या आहेत. जुलै महिन्यात पिकांची वाढ जोमात होत असते. आता पावसाने हजेरी लावली तरच पिके तरली जाणार आहेत. शेतकऱ्यांना अपेक्षित पावसाची प्रतिक्षा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us