महिलेनं पाच मुलींसह धावत्या रेल्वेखाली उडी घेतली, गरिबी आणि दारु जीवावर उठली, सरकारची चौकशीची घोषणा

| Updated on: Jun 11, 2021 | 8:34 AM

छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) देशाला हादरुन सोडेल आणि विचार करायला भाग पाडेल अशी घटना घडली आहे. एका महिलेनं स्वत: च्या पाच मुलींसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली आहे. (Mother With Five Daughter Commits Suicide jumping Front of Train in chhattisgarh)

महिलेनं पाच मुलींसह धावत्या रेल्वेखाली उडी घेतली, गरिबी आणि दारु जीवावर उठली, सरकारची चौकशीची घोषणा
एका महिलेनं स्वत: च्या पाच मुलींसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली आहे.
Follow us on

रायपूर : छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) देशाला हादरुन सोडेल आणि विचार करायला भाग पाडेल अशी घटना घडली आहे. एका महिलेनं स्वत: च्या पाच मुलींसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली आहे. त्यात महिलेसह सर्वांचाच मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल (Cm Bhupesh baghel) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. (Mother With Five Daughter Commits Suicide jumping Front of Train in chhattisgarh)

नेमकी घटना काय घडली?

छत्तीसगडमध्ये महासमुंद जिल्हा आहे. याच ठिकाणी एका महिलेनं स्वत:च्या पाच मुलींसह धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. महिलेचं नाव उमा साहू असून तिचे वय 45 वर्ष एवढे होते. मृत्यूमुखी पडलेल्या पाचही मुली या 10 ते 17 ह्या वयोगटातल्या होत्या. अन्नपूर्णा, यशोदा, भूमिका, कुमकुम, आणि तुलसी अशी मुलींची नावं आहेत.

घटना नेमकी कशी घडली?

उमा साहूंच्या नवऱ्याचं नाव आहे केजराम. तो हमाली करतो. दोघांना मिळून पाच मुली झाल्या. केजराम हा रोज दारु प्यायचा. त्यावरुनच घरात कायम तणावाचं वातावरण असायचं. केजराम आणि उमाबाई यांच्यात रोज भांडण होत असे. घरातली चणचण, त्यात नवऱ्याचं दारु पिणं यावरुनच घर कायम तणावात असायचं. नवरा दारू पिऊन आला की भांडण ठरलेलं असायचं. बुधवारी रात्रीही असंच नवरा बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर केजराम तशाच अवस्थेत झोपी गेला.

रात्री अकरा वाजता त्याला जाग आली तर घरात ना बायको उमा होती आणि पाच मुली. त्यानं शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे शोध घेतला पण कुणाचाच पत्ता लागला नाही. त्यानं झंझट नको म्हणून पोलीसातही तक्रार दिली नाही. रात्री साडे नऊ वाजता उमाबाईंनी पाच मुलींसह लिंक एक्स्प्रेससमोर उडी घेतली. त्यात सहाही जणींचा जीव गेला. केजराम इकडे त्यांचा शोध घेत राहीला. खरं तर दारू पिऊन ज्यावेळेस केजराम नशेत झोपी गेला होता त्याच काळात त्याच्या पूर्ण कुटुंबानं धावत्या रेल्वेखाली जीव दिला होता. गुरुवारी सकाळी सहाही जणींचे मृतदेह रेल्वे रुळावर सापडले.

केजरामनं पोलिसांना काय सांगितलं?

बायको उमासोबत दारु पिल्यामुळे रोज कशी भांडणं व्हायची हे केजरामनं पोलीसांना सांगितलं. एवढच नाही तर घरात पैशांची चणचण असायची त्यामुळेही तणाव असायचा असं तो म्हणाला. उमाबाईंना पाच मुलींच्या लग्नाचीही काळजी वाटायची असही केजरामनं पोलीसांना सांगितलं. विशेष म्हणजे ह्या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. चौकशीचे आदेश दिले. प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, केजराम यांच्याकडे 2 एकर जमीन आहे आणि यावर्षी त्यांना 26 क्विंटल पॅडीचं पिकही झालं होतं. स्वत: केजराम हा हमाली करतो. घरातल्या गरीबीपेक्षाही केजरामच्या दारुनं सहा जीवांचा अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

(Mother With Five Daughter Commits Suicide jumping Front of Train in chhattisgarh)

हे ही वाचा :

लेकासह छोट्या पाहुण्याला घेऊन शेतावर, दोघेही पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले, बुडताना पाहून बापाचे वाचवण्याचे प्रयत्न, पण तिघेही बुडाले!

Video : पावसाचं रौद्ररुप, नदीला पूर, दोन तरुण दुचाकीसह पुरात वाहून गेले, पण…..