मुंबईनंतर आता पुन्हा कलिंगड दुर्घटना, ऐन लग्नाच्या उंबरठ्यावर एकाच कुटुंबातील तीन जण…
बिजनौरमध्ये कलिंगड खाल्ल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याने फळांमधील विषबाधेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फळे पिकवण्यासाठी वापरली जाणारी रसायने कशी ओळखावीत आणि स्वतःचा बचाव कसा करावा, याबद्दलची महत्त्वाची माहिती.

मुंबईतील पायधुनी परिसरात काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये आता उंदीर मारण्याच्या औषधाचा अंश सापडल्याचे समोर आले आहे. ही घटना ताजी असतानाच, आता उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्येही कलिंगड खाल्ल्याने एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सध्या तिच्या आई-वडिलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात पुन्हा एकदा फळांमधील विषबाधेबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील शेरनगर नारायका गावात ही हृदयद्रावक घटना घडली. स्थानिक रहिवासी असलेल्या डॉ. झियाउल रहमान यांनी बाजारातून कलिंगड आणले होते. सध्या उन्हाळा वाढल्याने त्यांनी ते कलिंगड कापले. यानंतर त्यांनी आपली पत्नी आणि २२ वर्षीय मुलगी मुस्कानसोबत ते कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच या तिघांनाही तीव्र पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. यानंतर त्या तिघांची प्रकृती झपाट्याने खालावली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वाटेतच मुस्कानचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, मुस्कानचे लग्न ठरले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, एका फळामुळे या आनंदाचे रूपांतर आता मोठ्या दु:खात झाले आहे. यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. फळे लवकर पिकवण्यासाठी किंवा ती आतून अधिक लाल दिसण्यासाठी अनेकदा घातक रसायने आणि इंजेक्शनचा वापर केला जातो. बिजनौरमधील या घटनेमागे देखील हीच कीटकनाशके किंवा विषारी रसायने कारणीभूत असावीत, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी मुस्कानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
उन्हाळ्यात फळे खाताना काय काळजी घ्याल?
- कलिंगड किंवा इतर कोणतीही फळे खाण्यापूर्वी किमान एक तास थंड पाण्यात भिजवून ठेवावीत.
- फळावर कुठेही छिद्र किंवा इंजेक्शनची खूण दिसल्यास ते फळ खरेदी करू नका.
- नैसर्गिक रंगापेक्षा जास्त गडद लाल दिसणारे कलिंगड रासायनिक असू शकते.
- फळ खाल्ल्यावर अस्वस्थ वाटल्यास घरगुती उपाय न करता डॉक्टरांकडे जा.
