Muzaffarpur Hospital Fire : ICU मध्ये रुग्णांना वेदनांनी विव्हळत सोडून कर्मचारी पळाले.. संतप्त नातेवाईकांचा आरोप

मुझफ्फरपूर येथील प्रसाद रुग्णालयात भीषण आग लागून तीन रुग्णांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे पहाटे लागलेल्या या आगीत 20 हून अधिक जखमी झाले. धक्कादायक म्हणजे, रुग्णांना वाऱ्यावर सोडून रुग्णालय कर्मचारी जीव वाचवण्यासाठी पळून गेले. अग्निशमन दलाने खिडक्या तोडून बचावकार्य केले. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर अमानवीय वर्तनाचा आरोप केला आहे.

Muzaffarpur  Hospital Fire : ICU मध्ये रुग्णांना वेदनांनी विव्हळत सोडून कर्मचारी पळाले.. संतप्त नातेवाईकांचा आरोप
मुझफ्फरपूर येथे रुग्णालयाला आग लागली
| Updated on: Jun 04, 2026 | 9:11 AM

Bihar Prasad Hospital Fire : बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका रुग्णालयात आग लागली. मुझफ्फरपूरमधील प्रसाद रुग्णालयाच्या ICUमध्ये लागलेल्या या आगीत आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू झाला . यामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली. मात्र सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आग लागल्यावर रुग्णांना तसंच सोडून हॉस्पिटलच्या स्टाफने जीव वाचवण्यासाठी पळ काढला. प्रसाद रुग्णालयात पहाटे 3 च्या सुमारास आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि पाहता पाहता ती भडकली. यात तिघांना जीव गमवावा लागला. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर अमानवीय वर्तनाचा आरोप केला आहे.

या दुर्घटनेतील एका पीडिताच्या कुटुंबीयांनी साश्रूनयनांनी सांगितलं की, अपघातात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, परंतु रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांचा मृतदेह देण्यास नकार दिला. एवढंच नव्हे तर आगीची ही घटना घडल्यापासून रुग्णालयाच्या आवारातून अनेक कर्मचारी बेपत्ता आहेत, डॉक्टर आणि स्टाफ, रुग्णांना तसचं होरपळत, वेदेनेन विव्हळत सोडून गेले, त्यामुळे कुटुंबीय संतप्त झाले आहेत.

खिडकी-दरवाजे तोडून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वाचवला जीव

रुग्णालय प्रशासनाने मृत रुग्णांचे मृतदेहदेखील दिले नाहीत, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. आगीची ही माहिती मिळताच अगिनशमन दालच्या गाड्या तातडीने तिथे दाखल झाल्या. मात्र जेव्हा अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा रुग्णालयातील बहुतेक कर्मचारी पळून गेले होते, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. अडकलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी आयसीयू आणि इतर वॉर्डांच्या खिडक्या व दरवाजे तोडले आणि बचावकार्य सुरू केलं.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

आगीच्या या दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत 20 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यापैकी काही जणांची प्रकृती नाजूक असून, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

दरम्यान, जिल्हा दंडाधिकारी सुब्रता सेन यांनी तीन मृत्यू झाल्याची पुष्टी केली. गंभीर जखमी झालेल्या काही रुग्णांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला जात आहे. सध्या येथे तीन मृतदेह आहेत., अशी माहिती त्यांनी दिली. आग नेमकी कशी लागली, काय झालं, याबाबत सध्या पुढील तपास सुरू आहे. आगीच्या या दुर्दैवी घटनेनंतर रुग्णालयात उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

Follow Us