संधी मिळताच भविष्यात आम्ही…महिला आरक्षणावर मोदींचं सर्वात मोठं विधान; नेमकं काय घडणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. नारी शक्ती अधिनियम दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यानंतर मोदी यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

Narendra Modi Live Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह येत जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्ती विधेयक आणि विरोधकांची भूमिका यावर सविस्तर भाष्य केले. काँग्रेस पक्ष नेहमीच सुधारणाच्या आड आलेला आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांवर टीका केली. तसेच आज आमच्याकडे बहुमत नव्हते. परंतु आम्ही अजूनही हार मानलेली नाही. भविष्यात महिलांना आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू, असेही यावेळी मोदी म्हणाले.
आमच्यातील विश्वास अजूनही कमी झालेला नाही
आम्हाला देशातील महिलांचा पाठिंबा आहे. महिला आरक्षणाच्या आड येणाऱ्या प्रत्येक संकटाला आम्ही बाजूला करू. आमचा विश्वास, हिंमत अजूनही कमी झालेली नाही. महिला आरक्षणाचा विरोध करणारे पक्ष संसद आणि विधानसभेत महिलांची प्रतिनिधित्त्व वाढवण्याला कधीच रोखू शकत नाहीत, असे मोदी यावेळी म्हणाले.
भविष्यात आम्हाला संधी मिळेल तेव्हा…
तसेच, महिला आरक्षण लागू करण्यासाठी फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा आहे. महिलांच्या आरक्षणाबाबत भाजपा आणि एनडीएचा निश्चय अढळ आहे. काल आमच्याकडे बहुमत नव्हते. परंतु आम्ही पराभूत झालो, असा त्याचा अर्थ होत नाही. आमचा आत्मविश्वास अजेय आहे. आमचा प्रयत्न चालूच राहील. भविष्यात आम्हाला संधी मिळेल. देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या स्वप्नासाठी, देशाच्या भविष्यासाठी आम्ही आमचा संकल्प पूर्ण करून दाखवू, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
विरोधक नेमकं काय प्रत्युत्तर देणार?
याधीही काँग्रेसने सीएए, एनआरसी कायद्याला विरोध केलेला आहे. काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी डिजिटल पेमेंटलाही विरोध केला होता. काँग्रेसने कलम 370 हटवण्यालाही विरोध केला होता, असा हल्लाबोल यावेळी मोदी यांनी केला. मतदारसंघांची पुनर्रचना केल्यावर दक्षिणेकडील राज्यांना फटका बसणार आहे, असा दावा विरोधकांकडून केला जात होता. हा दावादेखील मोदी यांनी यावेळी फेटाळून लावला. हे विधेयक मंजूर झाले असते तर मी त्याचे श्रेय विरोधकांना देण्यास तयार होतो, असेही यावेळी मोदींनी सांगितले. दरम्यान, आता मोदी यांनी केलेले दावे आणि टीकेला काँग्रेस तसेच विरोधक कसे प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.