सावित्रीबाई फुले-अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा तात्पुरता हटवला; विरोधक आक्रमक, वाचा नेमकं प्रकरण काय आहे?

| Updated on: May 29, 2023 | 12:46 PM

Savitribai Phule and Ahilya Devi Holkar Statue News : सावरकरांची जयंती साजरी करताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तात्पुरता हटवला; विरोधक आक्रमक

सावित्रीबाई फुले-अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा तात्पुरता हटवला; विरोधक आक्रमक, वाचा नेमकं प्रकरण काय आहे?
Follow us on

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची काल जयंती होती. यानिमित्त दिल्लीतील महाराष्ट्र सदनात कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भाजप-शिवसेनेचे खासदारही उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तात्पुरत्या स्वरूपात हटवण्यात आला. त्यावरून सध्या आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सावरकरांच्या जयंतीचा कार्यक्रम करण्याला कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. पण सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्याचं काय कारण? या कृतीमुळे यांच्या मनात या दोन कर्तबगार स्त्रियांबद्दल किती आदर आहे ते सगळ्या महाराष्ट्राला कळाला आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सावरकरांच्या जयंतीला विरोध नाही. पण पुतळे हटवण्याचं काही कारण नव्हते. राजमुद्रा झाकण्याचे काम केलं गेलं. अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्याची हिंमत कशी होते?, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे. सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, असं भुजबळ म्हणालेत.

काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा निषेध त्यांनी केला आहे. भाजपला पुरोगामी विचारांना मारून टाकायचं आहे, ते पुरोगामी विचारांना मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे लोकशाहीच्या मंदिराचा उद्घाटन करत असताना दिल्लीतील कुस्तीपटूंचं आंदोलन मोडीत काढत आहेत. याचा मी निषेध करते, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे #chocklate_boy आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का?, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.